नवी दिल्ली – जानेवारीपासून सर्व शाळा अंशतः उघडाव्यात. विशेषतः बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी शाळा उघडण्यात याव्यात असे आवाहन भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा सचिव परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे.
बोर्ड परीक्षांचे तारीखपत्रक निश्चित करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकांचे वेळापत्रक समजावे यासाठी परिषदेने देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनाही पत्र लिहिले आहे.
कोविड-19 च्या साथीमुळे यावर्षी मार्च महिन्यापासून सर्व शाळा बंद आहेत. मात्र तरिही सर्व शाळांचे कामकाज ऑनलाईन माध्यमातून सुरू आहे. त्याचा आढावाही घेण्यात आला आहे, असे “सीआयएससीई’चे मुख्य कार्यकारी गेरी अरॅथोन म्हणाले.
जर शाळा उघडल्या गेल्या तर राज्यांच्या करोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला शाळांना सांगितले जाईल. मात्र प्रामुख्याने 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या अखेरच्या टप्प्यातील अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून जानेवारीपसून सर्व शाळा अंशतः उघडण्यात याव्यात अशी विनंती अरॅथोन यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे.