मुंबई – कोरोना साथीमुळे अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. अनलाॅकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बऱ्यास गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत मात्र शाळा आणि महाविद्यालयं अजूनही बंद आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. आता शाळा कधी सुरू होणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणे बाकी आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्याचं नियोजन कसं असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी घेतली जाणार आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यातच होणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.