नगर – करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता दहावी व बारावीचे वर्ग वगळून नगर जिल्ह्यातील सर्वच सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध असतील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून एक हजारांच्या पुढे रुग्ण संख्या आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल जिल्ह्याचा दौरा करून करोनास्थितीचा आढावा घेतला.
शाळा व धार्मिक स्थळे अशी गर्दीची ठिकाणे बंद करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेलता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहावी व बारावी वर्ग वगळा खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी व सरकारी शाळा एक महिना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार असून यावेळी पार्सल सुविधा देखील बंद ठेवण्यात आली आहे.
– आठच्या आत घरात
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या 15 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील. तर, रात्री आठ ते सकाळी सात या कालावधीत रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.