मुंबई – करोना महामारीमुळे दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. या दरम्यान मुले ऑनलाईन शिक्षण घेत होती. आता करोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून सुरू झाले आहेत. राज्यातील करोनामुक्त असलेल्या गावात आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे. तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये 15 जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील 919 गावे करोनामुक्त आहेत. या जिल्ह्यात सर्वात आधी गणेशवाडी शाळेने विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दार उघडले. गणेशवाडी येथील जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यासाठी कालपासूनच तयारी सुरू केली होती.
तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. शिक्षकांकडूनही वर्गात अध्यापनाचे काम सुरु झाले आहे. ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले होते, तर मोबाईलवर शिकवून शिक्षक कंटाळले होते. आता शाळा सुरु झाल्याने शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांना धडे देता येणार आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर म्हणाले की, करोनामुक्त गावांमध्ये आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी जवळपास 81 टक्के पालकांनी होकार दर्शविला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शाळा सुरू करताना करोनासंबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यासंदर्भात शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात अली असून कार्यपद्धतीचे काटेकोरपणानें पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच करोना चाचणी करुन घेणे या नियमांचे पालन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.