शिक्षण अधिकांऱ्यांकडे शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव…
वेल्हे(प्रतिनिधी) – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रशासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा बंदचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारकडून अजून असा कोणताच निर्णय घेतलेला नाही.यामुळे पालक व शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या मागास असलेल्या वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेंच्या गांव पातळीवर विशेष बैठक शुक्रवार (दि.१२) घेण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची शाळा चालु करण्यासाठी वेल्हे पंचायत समितीचे गटशिक्षणअधिकारी सुनिल मुगळे यांच्या आदेशानुसार वेल्हे तालुक्यातील शाळा १५ जून पासून सुरू करता येऊ शकेल का? या विषयावर प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक घेऊन बैठकीत झालेला निर्णय कार्यालयास कळविण्याबाबत लेखी आदेश दिले होते.
त्यानुसार वेल्हे तालुक्यातील १४४ जिल्हा परिषद शाळा ,११ हायस्कूल,१ खाजगी शाळा या विशेष बैठकीत सहभागी झाल्या होत्या.यामध्ये एकही शाळा व्यवस्थापन समितीने १५ जूनला शाळा उघडण्यास समंती दर्शवली नाही.त्यामुळे वेल्हे तालुक्यातील शाळा ह्या १५ ऑगस्ट पर्यंत बंद राहण्याची चिन्ह दिसत आहेत.
“१५ जुन पासून शाळा उघडण्याचा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.गाव पातळीवर तालुक्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेतली आहे.यात कोणत्याही शाळा व्यवस्थापन समितीने १५ जुनला शाळा सुरू करावी म्हटले नाही.जो पर्यंत राज्य सरकारचा निर्णय येत नाही तो पर्यंत शाळा बंद राहतील”
– सुनिल मुगळे, गटशिक्षणअधिकारी वेल्हे
वेल्हे तालुक्यात करोनाचा संसर्ग जास्त असल्याने शाळा लगेच चालू करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक असल्याने गांव पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने १५ ऑगस्ट पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तसा लेखी अहवाल केंद्रमुखांकडे दिला आहे.
काही शाळा व्यवस्थापन समितींनी करोनावर जोपर्यंत लस उपल्ब्ध होत नाही तोपर्यंत शाळा उघडण्यास नकार दिला आहे.पाबेच्या शाळा व्यवस्थापन समितीने १५ ऑगस्टलाच शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याकाळात शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र चालू ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांचे नियोजन केले आहे.