कोल्हापूर(प्रतिनिधी) – चळवळीचा हेतू स्पष्ट असला कि चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरी साठी नसून ज्ञान आदान प्रदानासाठी असतात परंतु सध्याच्या काळात या पैशांचा स्रोत बनल्या आहेत आणि यातून भांडवलशाही पुढे येत आहेत. याविरुद्ध लढा उभा करणे हि आता गरज बनली आहे. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. ते जयसिंगपूर येथील आयएमए हॉलमध्ये स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी नियुक्ती मेळाव्यात बोलत होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, विद्यार्थी चळवळ ही लोक चळवळ बनली पाहिजे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी निघाले आहेत. शिक्षणाचा बाजार होऊ नये, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक नवे आंदोलन उभे करू, अशी घोषणा यावेळी केली.
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी विद्यार्थी चळवळीचा इतिहास नमूद करून चळवळ कशी उभी केली पाहिजे, संघटन कसे असले पाहिजे आणि योग्य ध्येय व धोरणे आखून चळवळ कशी पुढे नेता येईल याचे मार्गदर्शन केले. यावेळी नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सावकर मादनाईक,अमोल हिप्परगे,जनार्दन पाटील, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे साखरपे,सचिन शिंदे,शैलेश आडके, सौरभ शेट्टी आदींसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.