पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारी 2020 रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. ती होऊन वर्ष उलटूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. राज्य शासनाकडून अजूनही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे निधी वर्ग केलेला नाही.
मागील वर्षी झालेल्या परीक्षेचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला. पाचवीसाठी 5 लाख 74 हजार 576 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 5 लाख 51 हजार 56 जण उपस्थित, तर 23 हजार 520 विद्यार्थी अनुपस्थित होते. यातील 1 लाख 36 हजार 820 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. आठवीसाठी 3 लाख 97 हजार 523 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 3 लाख 81 हजार 783 जण उपस्थित, तर 15 हजार 740 अनुपस्थित होते. 57 हजार 557 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले.
गुणवत्ता यादीत आलेल्या पाचवीच्या 16 हजार 683, तर आठवीच्या 16 हजार 258 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे सूत्रही निश्चित झाले आहे. पाचवीसाठी वर्षातील दहा महिन्यांसाठी 250 ते 1000 रुपये व आठवीसाठी 300 रुपये ते 1 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीसाठी दमहा 500 रुपये, तर आठवीसाठी 750 रुपये या सुधारित दराने शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर धूळखात पडून आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यासह आवश्यक ती माहिती शाळांकडून मागवली आहे. शिष्यवृत्ती वाटपासाठी सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यातला एक रुपयाही अदा झालेला नाही.
“त्या’ विद्यार्थ्यांनाही होणार लाभ
मार्च अखेरपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त होईल. त्यानंतर तो विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. मागील काही वर्षांमध्येही काही विद्यार्थ्यांकडून बॅंक खात्याची चूकीची माहिती दिल्यामुळे त्यांनाही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यावरही विद्यार्थ्यांनी योग्य ती अचूक माहिती सादर केल्यास त्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.