नवीन वर्ष उजाडणार : फक्त 4 हजार बिले तयार
दहावी, बारावीसाठी आले फक्त 8 हजारच अर्ज
पुणे – महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून “डीबीटी’द्वारे दहावी आणि बारावीच्या गुणवंतांना शिष्यवृती देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे साधारणपणे जानेवारीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती मुलांना ऑक्टोबरपासूनच मिळत होती. मात्र, यंदा अर्ज भरताना झालेला गोंधळ, अर्ज आल्यानंतर बिले तयार करण्यास झालेला उशीर आणि त्यानंतर आता बिलांची तपासणी करताना ऑडिट विभागात होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांना पुन्हा शिष्यवृत्तीसाठी जानेवारी उजाडणार आहे.
महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने अनुक्रमे 15 आणि 25 हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. यंदा या दोन्ही योजनांसाठीचे अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन तर, त्यानंतर ऑनलाइन अर्जांची प्रत सादर करण्यासाठी 5 डिसेंबरची मुदत देण्यात आली. या मुदतीत सुमारे 13 हजार ऑनलाइन अर्ज आले असले, तरी प्रत्यक्षात अर्जांच्या प्रती अवघ्या साडेआठ हजार मुलांनीच सादर केल्या आहेत. तर, प्रशासनाने ऑगस्टपासून हे अर्ज मागवले होते. त्यामुळे ज्यांचा अर्ज आधी येणार, त्यांची बिले तयार करून त्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, आता प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून सर्व विद्यार्थ्यांना एकाचवेळी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी 4 हजार मुलांची बिले तयार असून ती दोन आठवड्यांपूर्वी ऑडिट विभागाकडे तपासणीसाठी पाठवली आहेत. मात्र, ऑडिट विभागात दिरंगाई होत आहे. त्यानंतर आता समाज विकास विभागाने आणखी 2 हजार मुलांची बिले तयार केली असून ती पुढील आठवड्यात ऑडिट विभागाकडे पाठवली जाणार आहेत. मात्र, ऑडिट विभागात दिरंगाई होत असल्याने आता टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती न देता एकाचवेळी शिष्यवृत्तीची बिले देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ज्या 4 हजार मुलांची बिले तयार होणार आहेत. त्यांनाही इतर अर्ज तपासणी होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी थांबावे लागणार आहे. त्यामुळे गतिमान कामकाजासाठी “डीबीटी’चा निर्णय घेण्यात आला असला, तरी मुलांना शिष्यवृत्तीसाठी नवीन वर्षाचीच वाट पाहावी लागणार आहे.