पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी दिवाळीपूर्वी जाहीर होणार आहे. या दृष्टीने आवश्यक ती कामे वेगाने सुरु आहेत.
दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर होतो. यंदा लांबणीवर पडला आहे. अंतरिम निकाल 9 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. पाचवी परीक्षेसाठी 5 लाख 74 हजार 756 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 5 लाख 51 हजार 56 जणांनी परीक्षा दिली. त्यातील 1 लाख 36 हजार 820 विद्यार्थी पात्र ठरले.
आठवीच्या परीक्षेसाठी 3 लाख 97 हजार 523 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 81 हजार 783 विद्यार्थी उपस्थित होते. त्यामधील 57 हजार 557 विद्यार्थी पात्र ठरले.
गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्जासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. यात एकूण 1 हजार 556 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांनुसार पडताळणी झाली. पाचवीच्या गुणपडताळणीसाठी 968 अर्ज आले होते. त्यातील केवळ एका विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला.
आठवीच्या गुणपडताळणीसाठी 588 अर्ज दाखल झाले होते. यातल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाला नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील शिष्यवृत्ती विभागप्रमुख स्मिता गौड यांनी दिली आहे.