पुणे – राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल 20.83 टक्के लागला आहे.
निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित 31 हजार 428 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल 24.82 टक्के, तर आठवीचा 15.07 टक्के लागला आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून 5 लाख 51 हजार 64 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 36 हजार 821 विद्यार्थी पात्र ठरले. त्यातील 16 हजार 684 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
त्याचप्रमाणे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 3 लाख 81 हजार 787 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 57 हजार 567 विद्यार्थी पात्र ठरले. यातील 14 हजार 744 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.