मुंबई – अतिपावसामुळे मुंबईवरून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या आज रद्द कराव्या लागल्या. तर तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलावे लागले असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने मुंबईसह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबई-पुणे- इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्सप्रेस, हजूर साहिब नांदेड–पनवेल एक्सप्रेस आणि पनवेल-नांदेड हजूर साहिब एक्सप्रेस या गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर जयपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी वाशीरोड-पनवेल-कर्जतमार्गे वळवण्यात आली.
सिकंदराबाद- राजकोटे एक्सप्रेस ही गाडी दौंड-मनमाड-जळगाव-सूरत मार्गे वळवण्यात आली. तर पुणे- हजरत निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस ही गाडी दौंड- मनमाड- जळगाव-सूरत मार्गे वळवण्यात आली. या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्याचे आवाहन केले आहे.
कालच मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस काल वांगणी-बदलापूर स्टेशनदरम्यान पूराच्या पाण्यात अडकून पडल्यामुळे तब्बल 700 प्रवाशांना “एनडीआरएफ’आणि गावकऱ्यांनी रबरी बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने सोडवले.