गच्च काळोख झाला म्हणून
सूर्य उगवायचा थांबत नाही
पानं गळून गेली तरी
झाडं दुःख सांगत नाही.
सध्या तरी अवतीभोवती जे सुरू आहे ते बघून खूप संताप येतो. माणसाला त्याच्या स्वार्थाच्या पलीकडे काहीही कळत नाही. स्वार्थाला हजार तोंडं असतात. पण आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. अगदी तसंच आपल्या स्वार्थाचा चेहराही आपल्याला दिसत नाही. एखाद्याने आपला स्वार्थी चेहरा दाखविण्यासाठी आपल्या समोर आरसा धरला तरी आपल्या स्वार्थाच्या तेजाने त्या आरशावरच्या पाऱ्याचं पाणी होतं. पारा उडून जातो. आणि समोरच्या आरशात आपल्याला स्वार्थाचं हिणकस रूप दिसत नाही.
मुळात स्वार्थ साधून माणूस काय मिळवतो? मिळवलेलं सोबत काय येतं? याचं उत्तर प्रत्येकाला चांगलं माहीत आहे. काळाच्या ओघात उत्क्रांतीच्या टप्प्यात माणसाची शेपूट नाहीशी झाली. तशीच ही स्वार्थाची शेपूट नाहीशी होईल, तो सुदिन.
आपण स्वार्थाची शेपूट नाहीशी होण्याची शक्यता कमीच. कारण स्वार्थ हा अवयव नाही. तो अवगुण आहे. अवयव नाकारणं आपल्या हाती नाही. परंतु अवगुण नाकारणं; त्यांचा त्याग करणं नक्कीच आपल्या हाती आहे. पण ते आपल्याला साध्य होत नाही. कारण आयुष्यात साध्य काय हेच अनेकांना कळत नाही. भ्रष्टाचार केला, पैसा कमावला, माड्या बांधल्या, मौजमजा केली, जिभेचे चोचले पुरवले, देहाला आनंद दिला. देहाला का?… अगदी मनाला आनंद दिला असं मानू. परंतु आनंद हा स्थायी नाही. चिरकाल नाही. आनंद हा बाष्पाप्रमाणे असतो. हाती आला म्हणता म्हणता नाहीसा होतो. त्यामुळेच आनंदाच्या मागे धावण्यापेक्षा आनंदी राहायला शिकलं पाहिजे.
स्वार्थाला हजार तोंडं असतात असं मी म्हणालो खरं पण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन बघितलं तर परोपकाराची हजारो रूपं दिसतात. अर्थात अशी परोपकाराची रूपं माणसांमध्ये दिसण्याची शक्यता फारच कमी असते. परोपकाराची रूपं बघायची असतील तर माणसाने कारुण्याच्या डोळ्याने निसर्गाकडे बघावं. माणसाला खूप काही दिसतं. अशीच एक घटना मी काही दिवसापूर्वी बघितली. सोसायटीच्या पार्किंगच्या फेन्सिंग वॉलच्या कठड्यावर एक पक्षी बसलेला होता. बाजींद रूपं होतं त्याचं. बघत राहावं असं. त्याने कुठलाही मेकअप केलेला नव्हता. पण त्याच्याकडे बघताना मला माझा विसर पडला.
ते पाखरू उगाच खिळल्यासारखं बसून होतं. माझी त्याच्यावरची नजर हटत नव्हती. मी बघितलं त्याच्या चोचीत एक हिरवागार किडा होता. खरंतर त्यानं पाखराने तो किडा मटकावून ढेकर द्यायला हवी होती. पण तसं घडत नव्हतं. किडा चोचीत धरून ते इकडं तिकडं बघत होतं. माझ्या मनात आलं बहुदा ही आई असावी. ती आपल्या पिलांसाठी चारा घेऊन निघालेली असावी. मी त्या पाखरावरची नजर दूर होऊ दिली नाही. पाच-दहा मिनिटे गेले. पंख पसरून त्या पाखराने भुर्रकन झेप घेतली. माझी नजर त्याचा पाठलाग करत होती. पार्किंगच्या सिलिंगच्या एका कोपऱ्यात एक पाइप होता. त्या दिशेने ते पाखरू गेलेलं मी बघितलं होतं. मी तिथे गेलो आणि बघितलं तर खरंच तिथे एक घरटं होतं आणि त्या घरट्यात पिलं होती. चाऱ्यासाठी चोच उघडून गलका करत होती.
मी असं काहीतरी बघतो तेव्हा माझ्या लेखनीला पंख फुटतात. बाराखडीच्या आभाळात ती मुक्तपणे भिरभिरते. शब्दांचा चारा घेऊन येते. माझ्या आसुसलेल्या चोचीत भरवते. माझं लेखन आकार घेतं. तृप्त होऊन ढेकर देतं. लेखनाने मला खूप आनंद दिला. लिहिताना शब्दांचा चिवचिवाट मी अनुभवला. त्यांचा दरवळ श्वासात भरून घेतला.
पण रसिक वाचनात रमत नाही. पुस्तक हातात धरायचं. शब्दांमध्ये डोळे गुंतवायचे. जे काही वाचलं आहे त्याचा अर्थ लावण्यात मेंदूला गुंतवायचं. एवढं करण्यापेक्षा चारशे-पाचशे रुपयाचं तिकीट काढून मल्टिप्लेक्स गाठणं, पॉपकॉर्न तोंडात टाकता टाकता तीन तासांच्या सिनेमाची पाच-दहा मिनिटांची स्टोरी चार-दोन दिवसांसाठी लक्षात ठेवणं रसिकांना अधिक सोपं वाटतं. दोनशे रुपयांचं पुस्तक विकत घेण्यापेक्षा हॉटेलात जाऊन जिभेचे चोचले पुरवण्यात मजा वाटते.
पेट्रोल महाग झालं, महागाई वाढली म्हणत औटिंगला जाऊन समुद्रात डुबक्या मारण्यात धन्यता वाटते. तरीही आवतीभोवतीच्या काही माणसांमध्ये आदर्शवादाची काही रूपं दिसतात. अशी काही आदर्शवादी माणसं वगळता भोवतालचे चित्र अत्यंत निराशजनक आहे. अबलेवर बलात्कार होतात. एखादी स्त्री विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करते. अवती भोवती खूप वाईट गोष्टी घडत असतात. मनात निराशेचा काळोख दाटून येतो. वाटतं नकोच यापुढे लिहायला. पण तेवढ्यात सूर्य उगवताना दिसतो. त्याच्या डोळ्यादेखत अनेक वाईट गोष्टी घडत असतात म्हणून सूर्य उगवायचा थांबला नाही. मलाही थांबता येणार नाही. लिहीत राहायला हवं. कधीतरी ते उगवून येईल. समाजात रुजेल. त्याला सद्गुणांची घोस लागलेले दिसतील. तेव्हा… तेव्हा कृत्य कृत्य वाटेल.
विजय शेंडगे