गेल्या काही महिन्यांपासून ते अगदी परवापर्यंत बॉलीवूडमधील काही अभिनेते, अभिनेत्री, त्यांचे निकटवर्तीय तसंच काही धनाढ्यांची मुलं मादक द्रव्य सेवन केल्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल तपासयंत्रणांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. हे सगळं का घडतंय याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. मुळात सर्व सुख पायाशी लोळण घेत असताना मादक द्रव्यांच्या आहारी जावंसं का वाटतं हाही प्रश्न आहेच. अर्थात दरिद्री आणि रस्त्यावर आयुष्य कंठत असणारे लोकही मादक द्रव्यांचं सेवन करीत असतात.
दरिद्री मनुष्याची केस एक वेळ आपण समजू शकतो. त्यांना रोजच्या व्यथा विसरून जाण्यासाठी मादक द्रव्य निर्माण करीत असलेल्या आनंदाची अनुभूती आवश्यक वाटत असावी. परंतु ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत आहे अशांना मादक द्रव्याची गरज का भासावी? यासाठी आपल्याला त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. एकतर प्रचंड श्रीमंती असली की मनुष्य सुखी असतो हा केवळ भ्रम आहे. ऐहिक सुख आणि आनंद व समाधान या वेगळ्या गोष्टी आहेत.
मनुष्याला संपत्तीखेरीज अजून एका गोष्टीचं आकर्षण असतं आणि ते म्हणजे सत्ता किंवा समाजातील उच्च स्थान-पॉवर. बॉलीवूडमधील शिखर काय किंवा राजकीय सत्ता काय-दोन्ही म्हणजे अळवावरचं पाणी. कधी शिखरावरून धाडकन तळाशी नेतील याचा नेम नाही. यामुळे निर्माण होते ती चिंता, अभिशंका किंवा ज्याला इंग्रजीत अँग्झायटी अशी संज्ञा आहे ती! याखेरीज इंद्रिय सुखाचा भरपूर भोग घेतल्यानंतर पुढे काय या विचाराची पोकळी निर्माण होते त्यानं मानसिक शून्यता किंवा रिक्तता अनुभवाला येते.
या सर्वांपासून सुटका म्हणून मादक द्रव्याचं सेवन केलं जातं. या द्रव्यांमुळे मन एका हर्षाच्या उच्च पातळीला जाऊन पोचतं. यालाच इंग्रजीत “हाय’ असं म्हणतात. चिंतानाशाचा हा एक उपाय असला तरी तो अघोरी आहे. त्याचं कारण म्हणजे ही द्रव्यं व्यसन जडवणारी असतात. या द्रव्यांच्या व्यसनापासून मुक्ती मिळवणं अतिशय दुरापास्त असतं.
ही द्रव्यं ज्याला इंग्रजीत अल्कलॉइड्स म्हणजे विशिष्ट प्रकारची सेंद्रिय प्रथिनं असतात. असेंद्रिय रसायनांपेक्षा ही भिन्न आहेत. ती जास्त प्रमाणात घेतल्यास घातक विष ठरू शकत असले तरी कमी प्रमाणात घेतल्यास उत्तेजक असतात. अल्कलॉइड्स शरीरात व्यवस्थित शोषली जातात. असेंद्रिय विष ही ऊतींनाच नष्ट करतात. फार पूर्वीच्या काळापासून अल्कलॉइड पदार्थांचा नशेसाठी वापर होत आहे.
सर्पविष, धोत्रा, गांजा, अफू, तंबाखू अशा पदार्थांना खूप मोठा इतिहास आहे. राजे-रजवाडे तसंच अगदी काही साधू लोकसुद्धा अशा पदार्थांचा वापर करीत. मद्य हे जरी अल्कलॉइड नसलं तरी त्याचा परिणाम इतर मादक द्रव्यांप्रमाणेच होतो.
नैराश्य किंवा चिंतेपासून सुटका करून घेण्यासाठी मादक द्रव्याचा वापर अगदी अयोग्य आहे. एक तर ती व्यसनाला कारणीभूत ठरतात आणि दुसरं म्हणजे त्याचा अंमल नाहीसा झाल्यावर पुन्हा नैराश्य. मग व्यक्ती पुन्हा मादक पदार्थाला जवळ करते. अशा रीतीनं ती व्यक्ती दुष्टचक्रव्यूहात सापडते. त्यातून बाहेर येणं अतिशय अवघड.
अलीकडे तर अगदी लहान वयापासून “हाय’ला पोचण्याचे मार्ग शोधले गेले आहेत. पेट्रोल, फेव्हिकॉलसारखी रसायनं किंवा टायपिंग/प्रिंटिंगचं सफेतीकरण करणारं व्हाइटनर असे पदार्थसुद्धा या कामी वापरले जातात. या व्यसनाधीनतेपासून लहान मुलांची/तरुणांची सुटका कशी करायची ही एक मोठीच सामाजिक समस्या होऊन बसली आहे.
याचा एक अवघड पण महत्त्वाचा मार्ग म्हणजे रासायनिक हर्षापेक्षा खरोखरीचा आनंद मिळवण्याचे मार्ग दाखवणं आणि त्यांचं महत्त्व पटवून देणं. जीवनात प्रत्येकाला नैराश्याचा आणि चिंतेचा सामना करावा लागतो पण म्हणून व्यसनाधीनतेकडे वळून आयुष्याला नाशाकडे नेणं खचितच योग्य नाही.
हा खरोखरीचा आनंद मिळवण्याचे मार्ग म्हणजे छंद, सर्जनशील कला किंवा सामाजिक कार्य यांमध्ये स्वत:ला झोकून देणं. अनेक सेलेब्रिटींनीही हा मार्ग दाखवला आहे. ऑड्री हेपबर्नसारखी यशस्वी अभिनेत्री किंवा आपल्याकडील नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारख्यांनी समाजसेवेतून आनंद मिळवता येतो हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे.
श्रीनिवास शारंगपाणी