पुणे, दि. 2 – चांदणी चौकात दिव्यांचा लख्ख प्रकाश… परिसर निर्मनुष्य केल्यामुळे शुकशुकाट…डिटोनेटर व्यवस्थित बसवले का? कनेक्शन व्यवस्थित आले का? यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग…सगळं ओ.के., आसपास कोणी नाही ना? सर्वांनी प्रत्येकाची पोझिशन घ्या…क्षणभर भयाण शांतता…ठीक 1 वाजता “धुडूम’ आवाज झाला आणि अवघ्या काही सेकंदांत चांदणी चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त झाला…पुण्याच्या वाहतुकीचा आणखी एक बोलका इतिहास लुप्त झाला…तो इतका, की आता त्याच्या खुणादेखील शिल्लक नाहीत..त्यामुळे हा चौक उजाड झाला असून, त्याची “चांदणी चौक’ ही ओळखच पुसली गेली आहे.
पुणे शहराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार…थेट सातारा-कोल्हापूर आणि बंगळुरूला जोडणारा महामार्ग, राजधानी मुंबई काही मिनिटांच्या अंतरावर…कोकणाला पुण्याशी जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचा सेतू…आणि संरक्षण दलाच्या अकादमीकडे जाणारा मार्ग या सर्वांना एकत्र करणारा…असा या पुलाचा लौकिक..पण, काळाच्या ओघात वाहतूक वेगवान झाली, वाहन संख्या वाढली. त्यामुळे पूल अपुरा पडू लागला. तो पाडण्याचा निर्णय झाला आणि दररोजच्या वर्दळीतून वाट शोधताना ज्यांची या पुलाशी नाळ जोडली गेली होती, त्यांच्या काळजात धस्स झालं…पण, पर्याय नव्हताच… कालाय तस्मै नम:…