नवी दिल्ली – इटालीत होणाऱ्या सर्व धर्म शांतता परिषदेसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण आले होते. पण केंद्र सरकारने त्यांना त्यासाठी परवानगी नाकारली आहे. केंद्राच्या आकसाने घेतलेल्या निर्णयावर ममतांनी जोरदार टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, मला विदेशातील निमंत्रण आल्याने त्यांचा जळफळाट होतो आहे असे दिसते.
इटालित रोम येथे होणाऱ्या या परिषदेसाठी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांच्यासह जगभरातील पाचशे प्रतिनिधींना तेथे निमंत्रित करण्यात आले आहे. त्या परिषदेसाठी इटालीच्या सरकारने मला विशेष निमंत्रण दिले होते. पण मोदी सरकारने मला अनुमती नाकारली. मुख्यमंत्र्यांना अशा परिषदांना उपस्थित राहण्याचा अधिकार नाहीं असे कारण त्यांनी त्यासाठी दिले आहे.
त्या म्हणाल्या की मी मोदींसारखी विदेशात जाण्यासाठी उत्सुक नाही. पण मला आलेले निमंत्रण हा देशाचा सन्मान होता. मोदी हिंदुंच्या हिताच्या बाता मारतात, मी पण हिंदु आहे.
पण मला तुम्ही अनुमती का नाकारताय असा सवाल करून ममतांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे की तुमचा यामुळे जळफळाट होतोय. आम्हाला आमचे स्वातंत्र्य जपलेच पाहिजे. भाजप म्हणजे तालिबानी राजवट आहे. या राजवटीला एकटी तृणमुल कॉंग्रेस पराभूत करू शकते त्याची सुरूवात भवानीपुर पोटनिवडणुकीतून होंईल असेही त्या म्हणाल्या.
मोदींनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. या कोविड लसीला अमेरिकेने आणि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. तरीही मोदींनी अमेरिकेचा कसा दौरा केला असा आक्षेपही ममतांनी नोंदवला आहे.