मुंबई – भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत आला उमदेवार निवडून आणण्याची किमया केली होती. त्यामुळे विधान परिषदेत देखील भाजप आपला झंझावात कायम ठेवून अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना निवडून आणतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या काही मिनिटांत विधान परिषदेच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
निवडणुकीसंदर्भात सदाभाऊ खोत यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या आत सदाभाऊंनी आपला अर्ज मागे घेतला. दुसरीकडे काँग्रेसकडून विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अर्ज मागे घेतल्यानंतर सदाभाऊ म्हणाले की, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला निरोप आला. आपण पाच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहावी जागा मागे घ्यावी लागणार आहे. त्यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
भाजपकडून आमचा सन्मानच झाला
भाजपसोबत घटक पक्ष म्हणून आलो. मला मंत्रिपदंही दिली. महादेव जानकर, रामदास आठवले यांना मंत्रीपदं दिली. जेवढा सन्मान करायचा तेवढा भाजपनं केला आहे. मी समाधानी आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.