मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट अखेर आज (दि. 4) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज पासूनच सिनेरसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आणि आज हा चित्रपट प्रदर्शित देखील झाला आहे.
‘झुंड’मध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून, त्यांनी निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची कहाणी झुंड मध्ये पाहायला मिळणार आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात. आणि हाच संपूर्ण प्रवास झुंड मध्ये दाखविण्यात आला आहे.
दरम्यान, ‘झुंड’च्या निमित्ताने चित्रपटाची सर्व टीम नुकतीच झी-मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात आली होती. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने ‘झुंड’ चित्रपटातील ही संपूर्ण टीम नेमकी कशी तयार झाली? याबद्दल प्रश्न विचारला होता. तर यावर नागराज मंजुळे यांनी काही मजेशीर उत्तर दिले आहे.
नागराज म्हणाले की…, ‘झुंड’ हा चित्रपटच मुळात नागपूरच्या लोकांवर आधारित आहे. त्यामुळे जेव्हा मी त्याची पटकथा लिहित होतो, त्यावेळी विजय बारसे आणि इतर त्यांचे विद्यार्थी यांच्या वर्णनानुसार मी ते लिहिले. त्यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ही सर्व मुलं नागपुराती बिघडलेल्या आणि टपोरी भाषा बोलणारी आहेत. त्यांचे पात्र मी लिहित होतो. तेव्हा असे लक्षात आले की, जर याला कोणी न्याय देऊ शकत तर ती नागपूरची मुलंच असतील.’
आणि त्यानंतर मी, माझा भाऊ आणि त्याचा मित्र आम्ही तिघे तब्बल दोन महिने नागपुरात गेलो. आम्ही सकाळी, दुपारी कधी संध्याकाळी एखाद्या गल्लीत जाऊन, झोपडपट्टीत, पाण्याच्या टाकीजवळ जाऊन तशाप्रकारच्या मुलांचा शोध घेत होतो. त्यांच्याशी बोलायचो. असं नागराज मंजुळे यांनी सांगितलं. चित्रपटा बद्दल आणखी एक विशेष बाब म्हणजे झुंडच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी आर्ची-पारश्याची जोडी म्हणजेच, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.