पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर आणि नाशिक येथे उपकेंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. ही दोनही उपकेंद्र सक्षमीकरण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनने पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी तरतूद केली आहे.
यासंबंधिचे परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहे. विद्यापीठाचे नाशिक व नगर या उपकेंद्रास राज्य शासनाने 22 जानेवारी 2012 रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे ही उपकेंद्रे सक्षम होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने आता कामास सुरुवात केली आहे. गेली अनेक वर्ष ही उपकेंद्रे शासनाच्या उदासिनतेमुळे दुर्लक्षित होती. मात्र, आता तेथे अनेक कामे हाती घेण्यास विद्यापीठाला एकप्रकारची मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, या ठिकाणी विद्यापीठास मंजूर असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधातून कार्यरत कर्मचाऱ्यांमधून उपकेंद्राची ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करता येणार आहे. तसेच चतुर्थश्रेणीतील पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचा विचार करून विद्यापीठाने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी तात्पुरती तरतूद केली आहे.
पहिल्या टप्प्यात या दोन्ही उपकेंद्राच्या ठिकाणी लेखा व सर्वसाधारण विभागसाठी प्रत्येक कक्षाधिकारी, सहायक कक्षाधिकारी,
वरिष्ठ सहायक 4 आणि कनिष्ठ सहायक 2 असे एकूण 10 पदनामाची तरतूद केली आहे. प्रत्येक केंद्रास 5 या प्रमाणे ही पदनामाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उपकेंद्राच्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे प्रशासकीय कामास गती मिळण्याची चिन्हे आहेत.
………….
उपकेंद्राच्या ठिकाणी बदलीही होऊ शकते
विद्यापीठात आवश्यकतेनुसार उपलब्ध असलेल्या शासनमान्य पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी नाशिक व नगर उपकेंद्रासाठी बदलीद्वारे अधिकारी व सेवक दिले जाणार आहे. मात्र, चतुर्थश्रेणीतील पदे आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. त्यामुळे शासनमान्य पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपकेंद्राची ठिकाणी बदली करण्यास रितसर विद्यापीठाला अधिकार प्राप्त झाले आहेत.
…………
विद्यापीठात येणाऱ्यांची संख्या रोडावेल
उपकेंद्राच्या परिसरातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांची अडचणी, शंका त्याच ठिकाणी सोडविणे आवश्यक आहे. मात्र, उपकेंद्रासाठी विद्यापीठाचा मनुष्यबळ नसल्याने छोटी छोटी कामे अथवा प्रश्नांसाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्यांना पुणे विद्यापीठात यावे लागत होते. आता उपकेंद्राच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त होणार असल्याने नगर व नाशिकमधील अभ्यागतांची प्रश्नांची उत्तरे त्याचठिकाणी प्राप्त होतील. त्यामुळे विद्यापीठात येणाऱ्यांची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.