मुंबई: पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून बोईसर, धनानीनगर, पालघर, सातपाटी, डहाणू, बोर्डी, चिखले, विक्रमगड, वसई – विरार, नालासोपारा या भागांत पावसाने जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली आहे. तर वाडा, जव्हार या भागांत अधून मधून रिमझिम पाऊस होत आहे.
सकाळपासून मुसळधार होत असल्याने नाले आदी भरून वाहत असून अनेक ठिकाणच्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले
आहे. वसई आणि विरार इथं रस्त्यावर झाड उन्मळून पडण्याच्या घटना झाल्या आहेत. दोन महिन्यानंतर कालपासून पावसाने जिल्ह्यातल्या अनेक भागांत चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे चिंतेत आलेल्या बळीराजाही सुखावला आहे.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सावित्री आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला आहे. पुढच्या 48 तासात रायगडसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातल्या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी साचले. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला आहे. काल रात्री पासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पडझडीच्या घटना झाल्या आहेत. झाडे पडून काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित आहे. रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकसुद्धा ठप्प झाली आहे. सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 112 मिलीमीटर च्या सरासरीने 899 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात 140 मिलिमीटर एवढा पडला.
जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यात पावसाने गेल्या 24 तासात शंभरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2 हजार 810 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.