महाड – तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाइकांचे अश्रू पुसले.
मुख्यमंत्री आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास तळीये गावात पोहोचले.
यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भर पावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. धोकादायक अवस्थेत असणाऱ्या वस्त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे लागले. त्यासाठी आराखडा तयार करून लवकरात लवकर त्यांचे
पुनर्वसन करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
तळीये येथे गुरुवारी दरड कोसळून गावातील सुमारे 35 कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाड दौरा करत या घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ज्याला आक्रित म्हणावे अशा घटना घडत आहेत. त्या अनपेक्षित आहेत. मात्र, आता आपण त्यातून शहाणे होण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्याची सुरुवातच चक्रीवादळाने होते. त्यातून सावरण्यासाठी माणसे वाचवण्यासाठी धावपळ करत होते. त्यातच या सारखे आक्रित बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावेच लागेल. त्यासाठी सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचे चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.