मुंबई – भारताचा स्फोटक फलंदाज आणि मुंबईचा युवा खेळाडू सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खान यांनी केलेल्या दमदार खेळीच्या मदतीने मुंबईने पहिल्या डावात 230 धावा केल्या. यानंतर शम्स मुलानीने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा दुसरा डाव दिवसाअखेर 6 बाद 120 धावांवर गडगडला असून त्यांच्याकडे 179 धावांची आघाडी आहे.
#TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी
2 बाद 36 धावांवरून पुढे खेळताना सुर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध सुरूवात केली. परंतु धर्मेंद्रसिंह जडेजाने अजिंक्य रहाणे 24 धावांवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर सुर्यकुमार यादव आणि सर्फराज खान यांनी तिस-या विकेटसाठी 92 धावांची निर्णायक भागिदारी केली. सुर्यकुमार यादवने 107 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार खेचत 95 धावा केल्या. तर सर्फराज खान 75 धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 63.3 षटकांत 230 धावांवर आटोपला. सौराष्ट्रकडून धर्मेंद्रसिंह जडेजा आणि युवराजसिंह दोडिया यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.
59 धावांची आघाडी मिळाल्यानंतर दुस-या डावात सौराष्ट्रची सुरूवात निराशाजनक राहिली. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात हार्विक देसाईला शून्यावर बाद केले. यानंतर सौराष्ट्रचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्याने दिवसअखेर त्यांच्या 32 षटकांत 6 बाद 120 धावा झाल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने 50 धावांत 4 गडी बाद केले.
उत्तराखंडचे वर्चस्व
उत्तराखंडच्या वेगवान गोलंदाज दीपक धापोलाच्या भेदक गोलंदाजीमुळे हिमाचल प्रदेशचा पहिला डाव केवळ 49 धावात संपुष्टात आणल्यानंतर दुस-या दिवशी उत्तराखंडने पहिल्या डावात 336 धावा करत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. यात आदित्य तारेने 92 धावांची निर्णायक खेळी केली. यानंतर दिवसाअखेर हिमाचलने दुस-या डावात 4 बाद 277 धावा केल्या असून ते 10 धावांनी पिछाडीवर आहेत.
तामिळनाडू 89 धावांनी पिछाडीवर
दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि युवा अष्टपैलू खेळाडू प्रांश विजयरनने केलेल्या दमदार कामगिरीमुळे दुस-या दिवशी तामिळनाडूला 5 बाद 214 धावांपर्यत मजल मारता आली. दिल्लीने पहिल्या डावात 303 धावा केल्या असून तामिळनाडू अद्याप 89 धावांनी पिछाडीवर आहे.