तातडीने ओआयसीची बैठक घेण्याच्या मागणीला ठेंगा
इस्लामाबाद : काश्मीर मुद्द्यावरून उखाळ्यापाखाळ्या करण्यासाठी पाकिस्तानने तातडीने इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) बैठक बोलावण्याची मागणी केली. मात्र, ओआयसीचे नेतृत्व करणाऱ्या सौदी अरेबियाने अनुत्सुकता दर्शवत त्या मागणीला ठेंगा दाखवला. त्यामुळे नापाक मनसुबे रचणाऱ्या पाकिस्तानला मोठाच धक्का बसला.
भारताने धडक पाऊल उचलत मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्मीरवर वाकडी नजर असलेल्या पाकिस्तानचे पित्त खवळले. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतविरोधी कांगावा सुरू केला. मात्र, त्या देशाला प्रतिसाद मिळताना दिसला नाही. त्यामुळे किमान मुस्लिम देश तरी आपल्या पाठिशी असल्याचे चित्र पुढे यावे असा आटापीटा पाकिस्तानने सुरू केला आहे.
त्यातून त्या देशाने काश्मीर मुद्द्यावर ओआयसीची बैठक घेण्याची मागणी केली. मात्र, त्या मागणीला सौदीने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा फजिती झाली आहे. ओआयसीचे 57 मुस्लिम देश सदस्य आहेत. मात्र, त्या संघटनेकडूनही पाकिस्तानला फारसा थारा दिला जात नसल्याचेच स्पष्ट होत आहे. काश्मीर मुद्द्यावरून ओआयसी मौन बाळगून असल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती.