नवी दिल्ली- करोनावर आपल्या पतंजली या संस्थेने औषध तयार केल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आचार्य बालकृष्ण यांनी केला होता. मात्र त्यांनी अगोदर नियमानुसार आयुष
मंत्रालयाकडे यावे. त्यांच्या दाव्याचा अभ्यास करूनच याबाबत आम्ही त्यांना परवानगी देउ शकतो, असे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते. त्यामुळे पतंजलीच्या दाव्यातील हवा निघून गेल्यासारखी
स्थिती असताना भारतीय जनता पार्टी या सत्ताधारी पक्षाच्याच एका माजी मंत्र्याला आणि विद्यमान खासादाराला ही बाब रूचलेली नाही. त्यांनी यावर ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
भाजपचे बागपत येथील खासदार आणि माजी मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी म्हटले की, ज्याप्रमाणे आपण योग जगभर स्थापित केला त्याचप्रमाणे आताही आयुर्वेदाचार्य, तज्ञ, आयुर्वेद प्रेमी आणि भारत
सरकारने आयुर्वेदालाही जगभरात स्थापित करण्यासाठी आणि मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची व एकत्र येण्याची गरज आहे.आता वाद घालण्याची वेळ नसून संवादाची वेळ आहे. मोठा स्वार्थ
साधण्याची ही वेळ असल्याची टीप्पणीही त्यांनी केली आहे. सरकारचे मंत्री रामदेव बाबा यांच्या दाव्याला पुष्ठी देण्यास टाळाटाळ करत असताना आणि बाबांनी प्रक्रियेचे पालन करावे, तरच त्यांना अनुमती
दिली जाईल असे सांगत असताना याच सरकारच्या माजी मंत्र्याने विरोधी भूमिका घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.