महेश वायदंडे
रस्त्यांवरील घोळक्याने उद्भवताहेत दुर्घटनेचे प्रसंग
सातारा – रस्त्यासारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या सातारकर नागरिकांना आता मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: हैराण करुन सोडले आहे. चौकाचौकात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्याच आहेत. शिवाय हीच कुत्री रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे दुर्घटने प्रसंग उद्भवत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करुनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका चिमुकलीचा जीव घेतल्याच्या घटनेची पुनरावृत्तीची भीती सातारकरांमधून व्यक्त केली जात आहे.
सातारा शहरातील नागरिक हे सध्या प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे समस्यांचे ओझे झेलत आहे. रस्त्यासह विविध समस्यांना सातारकरांना रोजच सामोरे जावे लागत आहे. हे सर्व दिव्य कमी आहे की काय त्यामुळे आता मोकट कुत्र्यांनी सातारकरांना सळो की पळो करुन सोडले आहे. सातारा शहरात मोठ्या प्रमाणात मोकट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यावर पालिका प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून शहरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने मोकाट कुत्री फिरत असल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आधीच खड्ड्यांमुळे वाहने चालविताना जिकीर करावी लागत असताना रस्त्यावरुन वाहन चालविताना अचानक कुत्री आडवी येत असल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या असून यामध्ये अनेकांना दुखापती झाल्या आहेत.
याशिवाय पादचाऱ्यांच्या अंगावर ही कुत्री धावून जात असून त्यांना चावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कुत्री दिसताच सातारकरांना एका बाजून रस्ता शोध पळ काढावा लागत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी शहरात मोकट कुत्र्यांनी एका चिमुकल्याचा जीव घेतला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील कुत्र्यांचा चांगलाच बंदोबस्त केला होता. सध्या पालिकेकडून अशाच प्रकारची मोहिम आखून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.