नेमबाज राही सरनोबत, ऑलिम्पिक पात्रता मिळाल्यानंतर साताऱ्यात पहिला सत्कार
सातारा – सातारकरांनी मला उदंड प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यावर मायदेशी आल्यानंतर मी थेट साताऱ्यात आले, अशी प्रतिक्रिया नेमबाज राही सरनोबत यांनी दिली. विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेऊन राहीने भारतास ऑलिम्पिक पात्रता मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीतून ती मुंबईत आली व तेथून ती थेट साताऱ्यात आली.
तिचा पहिला सत्कार साताऱ्यात झाला. सातारकरांचा आशीर्वाद सतत कायम पाठीशी राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करून तिने सातारकरांचे आभार मानले. राहीच्या वडिलांचे सातारा आजोळ. एस. पी भोसले यांच्या निवासस्थानी ती आली. श्रीरंग व उर्मिला भोसले, डॉ. सुहास व अंजली पाटील, उपेन्द्र व प्राची नलावडे, डॉ. उत्कर्षा पाटील, डॉ. स्वस्तिका पाटील, आईवडिल जीवन व प्रभा सरनोबत, भाऊ अजिंक्य सरनोबत यांच्या उपस्थितीत राहीला गौरविण्यात आले.
माझी जबाबदारी मी उत्तमरित्या पार पाडेन, असा विश्वास व्यक्त करून राही म्हणाली, “” साताऱ्याशी माझे नाते स्नेहाने जोडलेले आहे. सातारा माझ्या आजीचे माहेर. वडलांचे आजोळ असल्याने लहानपणापासू साताऱ्यात खूप आठवणी मिळाल्या. त्यामुळे कोल्हापूरला जाताना नेहमीच साताऱ्यात थांबल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आप्तेष्ट, स्नेही यांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे सातारशी माझे नाते कायम आहे.”