पुणे – पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम केल्याचे समाधान वाटले. अनेक आव्हानात्मक प्रसंग आले. पण, त्यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्यात यशस्वी झालो, अशा शब्दांत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाली आहे, तत्पूर्वी शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, राजशिष्टाचार कार्यालय, भूसंपादन शाखा, गृह शाखा, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक कर शाखा, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अशा विविध शाखांना भेट देऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, सुनील गाढे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्रावण ताते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विनायक राऊत, सचिन तांबोळी, सचिन तारू, रवी कोळगे, योगेश ब्रम्हे, रामभाऊ भंडारी, तेजस्वीनी पारखी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी असून तिचे देखणेपण जपले गेले पाहिजे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे योग्य समाधान झाले पाहिजे, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार यांनीही केले कौतुक
पुणे शहराच्या प्रश्नांची जाण असलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राम दिल्लीतूनही प्रयत्न करतील, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतूक केले.