मुंबई: महाराष्ट्रांतील धरणांमध्ये आता एकूण सरासरी 49 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत राज्यातल्या एकूण धरणातील पाणीसाठा 57 टक्के इतका होता. रविवार दि. 9 ऑगस्टपर्यंतची ही स्थिती आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने त्या भागातील धरणे 66.49 टक्के इतकी भरली आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या भागातील धरणसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र हा साठा समाधानकारक नाही.
औरंगाबाद विभागातील पाण्याची स्थिती यंदा तुलनेने खूपच चांगली आहे. तेथील एकूण पाणीसाठा आता 43.35 इतका झाला असून गेल्या वर्षी याच कालावधीत तेथे केवळ 23.46 टक्के इतका पाणीसाठा होता.
नागपूर विभागातही गेल्या वर्षीच्या 31.91 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 54.49 टक्के इतका पाणीसाठा आहे. नाशिक विभागात मात्र अजून पावसाची आवश्यकता असून तेथे गेल्या वर्षीैच्या 57.6 टक्क्यांच्या तुलनेत यंदा केवळ 42.46 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे.