पुणे: काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे रविवारी पहाटे निधन झाले. करोनातून बरे झाल्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली,अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
46 वर्षीय सातव हे अखिल भारतीय काँग्रेस समितीचेही सदस्य होते. पहाटे पाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसात त्यांना सायटोमॅनगीलो विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यांना करोनाच्या संसर्ग झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केले होते.सातव हे माझे जवळचे मित्र होते. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज पुण्यात आलो पण मी माझा मित्र पहाटे पाच वाजता गमावला होता, अशी भावना यांनी व्यक्त केली.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीला संसर्ग करणारा सायटोमॅनगीलो विषाणू हा सामान्य विषाणू आहे. सातव गेल्या आठवड्यात करोना मुक्त झाले होते. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र नव्याने झालेल्या संसर्गाने त्यांची प्राकृती ढासळली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. करोनाशी 20 दिवस लढा दिल्यानंतर सातव त्यातून बरे झाले होते. मात्र त्यांच्या फुफ्फुसची हानी मोठया प्रमाणात झाली होती, असे राज्यातील मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सातव यांना जहांगीर रुग्णालयात 23 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यात गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले होते.
16 व्या लोकसभेत ते हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले होते. ते काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी होते. त्यापूर्वी ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती.
माझे मित्र राजीव सातव यांना गमावल्याचे समजल्याने मला खूप दु:ख झाले आहे. प्रचंड क्षमतेचा आणि काँग्रेसच्या विचारधारेवर अतूट निष्ठा असणारा हा नेता होता. ही आम्हा सर्वांची मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियाप्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
राजीव सातव यांच्या निधनाने आम्ही एक उमदा सहकारी गमावला आहे. मनाने स्वच्छ आणि सजग तसेच काँग्रेसच्या विचारांवर अढळ निष्ठा असणारा हा कार्यकर्ता होता. जनसेवेची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची तरुण पत्नी आणि मुलांसाठी मी प्रार्थना करते. त्यांच्याशिवाय जगण्याचे बाळ त्यांना लाभो असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.