सातारा -जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कराड, जावळी तालुक्यातील वाढती संख्या चिंतेची बाब आहे. सातारा शहरातही करोनाबाधित रुग्ण सापडला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, सातारकरांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा, कराडनंतर बुधवारी जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी करोनाबाधित आढळल्यानंतर सातारा शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी जनतेला हे ेआवाहन केले आहे. आजपर्यंत सातारा शहर करोनापासून सुरक्षित होते. परंतु, आज नगरपालिका हद्दीत करोनाबाधित रुग्ण आढळला. कराड भागातील रुग्णसंख्याही वाढत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत आहेत. परंतु, घाबरून जाण्याचे कारण नाही, आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. प्रशासन मोठ्या हिम्मतीने काम करत असून त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. कराड व सातारा ग्रामीण भागातील बाधित क्षेत्रातील प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रत्येक नियम व अटींचे तंतोतंत पालन करणे खूप गरजेचे आहे, असेही उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.