सातारा – कास, कण्हेर व उरमोडी या तीन जलस्रोतांची श्रीमंती अनुभवणाऱ्या सातारकरांना पाणीबाणीतही पाण्याची किंमत कळेनाशी झाली आहे. वीस दशलक्ष लीटर पाणी उपसा होताना गळती 23 टक्के असल्याने सुमारे चार दशलक्ष पाणी वेगवेगळ्या कारणांमुळे वाया जात आहे. कासची डेडलाईन 15 जून असून पावसाने ओढ दिल्यास साताऱ्यात पाणीटंचाईचे संकट खूपच तीव्र होणार आहे.
पाणी बचतीचा मंत्र देणारे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प सातारा शहरात हाताच्या बोटावर आहेत त्यामुळे पाणी बचतीत सातारकरांना स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय इमारत पूर्णत्वाचे दाखले देऊ नका या अध्यादेशाला तब्बल 16 वर्ष उलटली. मात्र अद्यापही हा आदेश सातारा पालिकेने गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साताऱ्यातील कण्हेर-उरमोडी व कास तलाव हे तीन जलस्रोत सातारकरांची तहान भागवतात.
मात्र यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई प्रचंड गंभीर वळणावर येउन ठेपली आहे. कास तलावाच्या पाणी साठ्याची वाटचाल डेडस्टॉककडे निघाली असून उरमोडीतही सांगली आवर्तनामुळे सव्वा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. साताऱ्यात पाणीप्रश्न पेटलेला असताना सातारकरांमध्ये पाणी बचतीची आस नसल्याचे दिसत आहे. पाण्याची दुहेरी आवर्तने, जुन्या पाईपलाइनच्या गळती, बेकायदा नळ कनेक्शन, पाणीवहनातील गळती व बाष्पीभवन पाण्याच्या टाक्या ओव्हर फलो होणे यामुळे साताऱ्यात वेगवेगळ्या कारणांनी चाळीस लाख लीटर पाण्याची नासाडी होत आहे. पण यांचे गांभीर्य ना प्रशासनाला ना सातारकरांना. साताऱ्यात पालिका व खाजगी असे पंचवीस हून अधिक टॅंकरच्या दिवसाला पावणेदोनशे फेऱ्या होत असून खाजगी पाणी वितरकांचे या उन्हाळ्याचे शहराचे वॉटर ऑडिट एक कोटीवर पोहोचले आहे.
प्रकल्पच नाही तर तपासणी कसली?
रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, सोलर एनर्जी या प्रकल्पांना उत्तेजन देण्यासाठी सातारा पालिकेने मिळकत करात पाच टक्के सवलत देण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र, या यंत्रणांची तपासणी करणारे मनुष्यबळच नसल्याने या चांगल्या योजनांची अंमलबजावणी अभावी महत्त्व कमी झाले आहे. हार्वेस्टिंगचे फिल्टर पाईपच तकलादू असल्याने काही ठिकाणचे प्लॉंट बंद पडले आहेत.
सातारकरांनो जरा लक्ष द्या
पाणी जपून वापरल्यास शहरात वीस कोटी लीटर पाणी वाचवले जाऊ शकते.
साताऱ्याची लोकसंख्या सव्वालाख आहे. त्यामुळे प्रति माणशी दहा हजार लीटर पाणी बचत सातारकरांना शक्य आहे.
प्रतिमाणशी 110 लीटर इतक्याच प्रमाणात पाणीपुरवठा असावा.
सरकारी इमारतीची बोंब
2008 मध्ये राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात सरकारी व निमसरकारी इमारतींना एसटीपी (सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प) बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, सातारा पालिकेच्या मुख्य तीन इमारती व इतर छोटे मोठे सोळा संकुले यांना कोठेही हार्वेस्टिंग देण्यात आलेले नाही. जिथे पाणी बचतीत सातारा पालिकाच गंभीर नाही तिथे सातारकरांकडून काय अपेक्षा करायची? हा प्रश्न आहे.
प्रकल्पच नाही तर तपासणी कसली?
रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, सोलर एनर्जी या प्रकल्पांना उत्तेजन देण्यासाठी सातारा पालिकेने मिळकत करात पाच टक्के सवलत देण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र, या यंत्रणांची तपासणी करणारे मनुष्यबळच नसल्याने या चांगल्या योजनांची अंमलबजावणी अभावी महत्त्व कमी झाले आहे. हार्वेस्टिंगचे फिल्टर पाईपच तकलादू असल्याने काही ठिकाणचे प्लॉंट बंद पडले आहेत.