शेतकऱ्यांना प्रतीक्षा समाधानकारक पावसाची
किरण देशमुख
खटाव – जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. शेतजमिनीत पाणी साठून पिकांचे नुकसानही झाले आहे. मात्र खटाव जिल्ह्यातील दुष्काळी तालुके म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माण-खटावमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. माण-खटाव तालुक्यातही गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला आहे. मात्र हा पाऊस म्हणजे खरिपाच्या पिकांसाठी सलाईनप्रमाणेच ठरला आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी खटाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन महिने होत आले असले तरी अजून ही खटाव परिसरात समाधानकारक पाऊस पडलाच नाही. मागील पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे चालू पिकांना संजिवनी नक्कीच मिळाली आहे. काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव मात्र अधिक वाढल्याचे निदर्शनास आले. काही शेतकऱ्यांचे असे मत आहे की हा पाऊस पिकांसाठी सलाईनचे काम करीत आहे. खटावच्या पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे नदीला मात्र पाणी आले आहे. हे पाणी कालव्यात सोडण्याची मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.
खटावच्या पश्चिम भागात म्हणजेच जांब, रेवलकरवाडी व रामाचा डोंगर परिसरात काहीसा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने येथील जीवनदायिनी असलेल्या पण कोरड्या पडलेल्या येरळा (वेदावती) नदीला मात्र काहीसे पाणी वाहू लागले आहे. येथील पूर्व भागातील म्हणजेच खटाव, भरकवडी, दरूज, हुसेनपुर, सि.कुरोली आदी ठिकाणचे ओढे, तलाव, विहिरीत अजूनही म्हणावा असा पाणी साठा झालाच नाही. काही विहीरी, तलाव तर अजून कोरडेच आहेत. या परिसरातील बळीराजाची चालू सुगी कशी बशी बाहेर पडले, पण रब्बी हंगाम मात्र पुरेशा पाण्याअभावी वाया जाणार की काय? या चिंतेने ग्रासले आहे.
सुरवातीच्या काळात समाधानकारण पाऊस झाल्या नसल्याने येथील जलसाठे अजून समृद्ध झालेच नाहीत. चालू हंगाम काही अंशी मार्गी लागेलदेखील परंतु पुढील हंगामाची मात्र शेतकरी वर्गास चिंता लागून राहिली आहे. कोल्हापुर, सांगली या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती पण इकडे पुरेशा पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या येथील खटाव परिसरातील येरळा नदीपात्रातून काही प्रमाणात वाहून जात असलेल्या पाण्याचा जर कोरड्या पडलेल्या विहिरी, तलाव, बंधारे आदींचे पुनर्भरण करण्यासाठी वापर करण्यात आला तर भविष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगास बळीराजास सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे सध्या वाहत असलेले नदीचे पाणी खातगुण येथील डाव्या व उजव्या कालव्यात सोडल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेलचे पुनर्भरण करण्यासाठी वापरात आणावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासनाने, नेते मंडळींनी गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आज नदी पात्रातील वाहून जाणारे पाण्याचा शेतकऱ्यांची हितासाठी वापर केला तर उद्याची संभवत असणारी दुष्काळी स्थिती काही अंशी नक्कीच आटोक्यात येईल. शेतकऱ्यांच्या या मागणीची संबंधितांनी गांभीर्याने दखल घ्यावी व शक्य तेवढ्या लवकर पश्न निकाली काढावा.
विशाल बागल,प्रगतशील शेतकरी, खटाव.