आ. महेश शिंदे यांनी केले पूजन; श्री सेवागिरी महाराजांच्या समाधीस जलाभिषेक
पुसेगाव – खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिहे- कटापूर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोहचले. अखेर 26 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिहे कटापूर योजनेच्या वर्धनगड घाटातील बोगद्याद्वारे नेर तालावात पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी सात वाजता पार पडले. त्यावेळी त्यांचे समर्थक तसेच कोरेगाव व खटाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. युती शासनाच्या काळात 1995 मध्ये मंजूर झालेल्या या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते.
अखेर 26 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी पोहचले. दरम्यान, पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वैशालीताई फडतरे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस जलाभिषेक करण्यात आला. तसेच या पाण्याचे कलश भागातील प्रत्येक गावात दिले असून त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या युती शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरू करून विकासाचा दर वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. कृष्णा नदीच्या पाणीवाटप करारानुसार महाराष्ट्र 2000 पर्यंत पाणी अडवू शकतो हे सरकारच्या लक्षात येताच कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवावे, असे धोरण ठरविण्यात आल.
जिल्हा निवृत्त अभियंता मंडळाने जिहे-कठापूर पाणी योजना मांडलू होती. कोरेगाव तालुक्यातील जिहे- कटापूर येथे पाणी अडवून तेथून ते पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे खटाव तालुक्यातील नेर तलावमध्ये सोडण्यात येणार अशी ही योजना होती. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून योजनेला मान्यता देण्यात आली होती. पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली आता उदघाटनाचा मुहूर्त कधी असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
नामकरणावरून वादापेक्षा पाणी पोहचावे…
युतीच्या काळात सुरु झालेल्या या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याचे कारण सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही शिवसेनाप्रमुखांच्या नावाविषयी आग्रही दिसत आहेत. शिवसेनेने विशेषतः माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील व उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी या योजनेसाठी अनेक आंदोलने केली. तर फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यासाठी विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी आग्रही आहेत. यामुळे येत्या काळात नामकरणावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण यावर शिवसेनेतील एकही जेष्ठ नेता बोलायला तयार नाही हेही विशेष आहे. तरीही नामकरणावरून वाद करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लवकरात लवकर या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांनी मिळवून द्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.