बलकवडी धरणाच्या सांडव्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
सातारा/कवठे (प्रतिनिधी) – पसरणी, ता. वाई येथील अजय विजय महांगडे (वय 22) याचा शनिवारी (दि. 22) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बलकवडी धरणाच्या सांडव्यावरून पडून मृत्यू झाला. सेल्फी काढत असताना पाय घसरून अजय हा धरणात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अजय व त्याचे सात मित्र काल वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील बलकवडी येथील धरण पाहायला गेले होते. धरणावरील सुरक्षारक्षक दुपारी जेवायला गेला होता. अजय व त्याचे काही मित्र दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सांडव्यानजीक उभे राहून सेल्फी घेत होते. त्यावेळी तोल गेल्याने अजय धरणाच्या सांडव्यावरून सुमारे दीडशे फूट खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होता. या दुर्घटनेनंतर विसर्ग थांबवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी हवालदार संतोष शेलार व बी. व्ही. धायगुडे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी दुर्घटनेची माहिती अजयच्या मित्राकडून घेतली.
उळुंब येथील पुलाजवळ असलेल्या कोळी समाजातील नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून टायरच्या साह्याने अजयचा मृतदेह शोधून बाहेर काढला. दरम्यान, बलकवडी धरणावर नेमलेले दोन सुरक्षारक्षक कधीच धरणावर उपस्थित नसतात. त्यांच्या बेजाबदारपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.