कुडाळ – अतिवृष्टीचा आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात सध्या 31 गावे व 17 वाड्यावस्त्यांवर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. टंचाईग्रस्त गावांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना राबवणार याकडे टंचाईग्रस्त गावांचे लक्ष लागून राहिले आहे.
जावळी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे पुढीलप्रमाणे आहेत. म्हाते बु., म्हातेखुर्द, थोरली काळोशी, कुसुंबी- बालदारवाडी, बौद्ध वस्ती, सांगवी तर्फ मेढा सांगवी मुरा, मोरावळे, खामकरवाडी, तेटली शिवाजी वाडी, तेटलीमुरा, केळघर तर्फ सोळशी, सुतारवस्ती, बाहुळे, भुतेघर, भुतेघरमुरा, दुंद, रेंगडी, कुरळोशी, वारणेवस्ती, बौद्धवस्ती, रेंगडीमुरा, वरोशी, बामनोली कसबे, भोगवली तर्फ मेढा, दंडवस्ती, भोगवलीमुरा, निपाणीमुरा, निपाणी, तेटली, मुनावळे, रुईघर, गणेश पेठ, बोंडारवाडी, नांदगणे, पुनवडी, डांगरेघर, वाटांबे. या गावांमधील कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे तात्काळ या गावांना टँकर सुरू करावेत, अशी मागणी या गावांमधील नागरिकांकडून होत आहे.
पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहत आहेत. त्यामुळे दस्तुरखुद्द गटविकास अधिकाऱ्यांना या गावांची भीषण पाणीटंचाई कशी आहे याबद्दल माहित आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी पंचायत समितीच्या मासिक सभेत मार्च महिन्यातच हा आढावा घेतला जाऊन एप्रिलच्या सुरुवातीला टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करण्यासाठी कार्यवाही केली जायची. मात्र, आता पंचायत समितीतील सभापती, उपसभापती, सदस्य यांचा कार्यकाल संपल्यामुळे प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काळे काम पाहत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.