पुसेगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रसह इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी रथोत्सव आणि दहा दिवसांचा यात्रा कालावधी नियंत्रण कक्षाच्या अधिपत्याखाली राहणार असून आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाला तर संबंधित विभागाच्या कार्यालयीन प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल. यात्रा कालावधीत संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ नये, म्हणून विशेष दक्षता घ्या, अशा सूचना प्रांत शैलेश सुर्यवंशी यांनी दिल्या.
श्री सेवागिरी महाराजांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रथोत्सव आणि यात्रा नियोजनासाठी आज येथील नारायणगिरी सभागृहात आयोजित केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी डीवायएसपी गणेश किंद्रे, तहसीलदार किरण जमदाडे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बीडीओ उदयसिंह साळुंखे, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, सुरेशशेठ जाधव, मानाजीकाका घाडगे आणि शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले, ”यात्रा कालावधीत सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात हे गृहीत धरुन शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र बसून नियोजन आणि तयारी करावी. कोणतीही अडचण न येता दर्शन घेता यावे, गर्दीवर नियंत्रण राहवे, वाहतुकीसाठी पुरेशा बसेस उपलब्ध व्हाव्यात, रस्ते, पाणी, वीज या सुविधा योग्य प्रमाणात मिळण्यासाठी सर्वच विभागांनी समन्वय ठेवून काम करावे.” यात्रेतील अन्नपदार्थांच्या सर्व स्टॉल्सची अन्नभेसळ विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. मनोरंजनासाठी येणाऱ्या मोठ्या पाळण्यांची तपासणी पीडब्ल्यूडीच्या यांत्रिक विभागाकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा
तहसीलदार जमदाडे म्हणाले, “महसूल आणि अन्य विभागातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नियंत्रण कक्ष मंदिर आवारात कार्यरत रहाणार आहे. सर्वच विभागांनी यात्रेतील त्यांच्या जबाबदाऱ्या, करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध मनुष्यबळाची माहिती दोन दिवसांत सादर करायची आहे.” पुसेगावकडे येणारे सर्व आणि अंतर्गत रस्ते, रथमार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना त्यांनी संबधित विभागाला दिल्या.
पुसेगाव ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. स्वच्छतेची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. फिरत्या शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
लम्पी प्रादुर्भावामुळे बैलबाजार रद्द …..
खिलार जनावरांमधील लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. या रोगाचा उद्भभावन कालावधी १४ ते २८ दिवसांचा असतो. पुसेगाव यात्रेतील बैलबाजारात संपूर्ण राज्यातून येणाऱ्या जनावरांची मोठी संख्या आणि त्यामुळे लम्पीचा होणारा संभाव्य फैलाव विचारात घेता बैलबाजार भरविता येणार नसल्याचे प्रांत शैलेश सुर्यवंशी यांनी सांगितले. बैलगाडी शर्यतीबाबत पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांचा अभिप्राय आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीत आरोग्य, वीजवितरण, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, महसूल, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभागाच्या तयारीचा आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. विश्वस्त डॉ. सुरेश जाधव यांनीही रथोत्सवाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या. आभार मानताना चेअरमन बाळासाहेब जाधव म्हणाले, ‘यात्रा कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाला देवस्थान ट्रस्टकडून सर्वोतपरी मदत केली जात आहे.’