सातारा – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कर्फ्यूचा आदेश देण्यात आला होता. मात्र, तरीही सर्रासपणे रस्त्यावरून दुचाकीसह फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी काही जणांना लाठीचा प्रसाद दिला होता. त्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करू नये असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी नामी शक्कल लढवत रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांच्या तब्बल पंधरा दुचाकी जप्त करून यापुढे पोलिसांची लाठी नाही तर कायदा बोलेल असा इशारा दिला आहे.
त्याच झाले असे, देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून लाॅकडाऊनसह सरकारने राज्यात कर्फ्यूचा आदेश दिला होता. त्या आदेशाला न जुमानता सातारा शहरातून अनेकजण विनाकारण रस्त्यावरून फिरत होते. त्यांना वेळोवेळी समजावून सांगूनही त्यांच्यात फरक पडत नसल्याने अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांनी काही जणांना लाठीचा प्रसाद दिला होता. त्याच्या झालेल्या तक्रारी व सोशल मीडियावरून व्हायरल झालेले व्हिडिओ याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण न करण्याचे आदेश पोलिस कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
या आदेशानंतर शहरातून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने अखेर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. एक दोघांना प्रसाद दिल्यानंतर टीकेचे धनी झालेले पोलीस रस्त्यावरून वाढलेल्या वाहतुकीमुळे सुद्धा टीकेच्या लक्ष्यस्थानी राहील्याने पोलिसांनी आता नामी शक्कल लढवली आहे.
शहरातील विविध रस्त्यांवरुन विनाकारण फिरून कर्फ्यूच्या आदेशाला हरताळ फासणार्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले आहे. त्याचाच परिणाम शनिवारी सातार्यात दिसून आला. सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहरातून पेट्रोलिंग करत असताना अनेक दुचाकी थांबवून रस्त्यावर येण्याचे कारण दुचाकी चालकांना विचारले . त्यावेळी संबंधितांना ठोस कारण सांगता न आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर वाहतूक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करुन त्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे शहरातून विनाकारण फिरणार्यांची चांगलीच तंतरली आहे.
नियमानुसार कारवाई होत राहतील
सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घरात राहणे अपेक्षित असतानाही काहीजण जाणीवपूर्वक रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आरोग्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा पद्धतीच्या कारवाई नियमानुसार सुरूच राहतील.
तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक.
दादा, भाईंच्या फोनला कात्रजचा घाट
कर्फ्यूचा आदेश लागू झाल्यापासून पोलिस वारंवार विनवण्या करून अनेकांना समजावत होते. मात्र, तरीही रस्त्यावरची गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी गाड्या जप्त करून विनाकारण फिरणार्यांवर कारवाई केल्यानंतर अनेक दादा, भाईंनी पोलिसांना फोन करुन कारवाई न करण्याची विनवणी केली. मात्र, पोलिसांनी त्या विनवणीला कात्रजचा घाट दाखवून कारवाई यापुढे सुरुच राहील असा इशारा दिला आहे.