सागरिका कॅन्टीनचे उद्धघाटन ; पोलिसांसह आजी माजी सैनिकांनाही सवलत ; ना. देसाईंचा असाही मोठेपणा
सातारा, दि.18 (प्रतिनिधी)
सातारा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सागरिका कॅन्टीनच्या माध्यमातून बाजारभावापेक्षा निम्म्या दराने पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी फायदा घ्यावा. सातारा पोलीस दलाने राबवलेला हा उपक्रम राज्यभर राबवला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिली. ते पोलीस करमणूक केंद्रावरील सागरिका या कॅन्टीनच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना किराणा माल बाजारभावापेक्षा कमी दराने मिळावा, यासाठी तत्कालीन अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी सागरिकाची संकल्पना पुढे आणली होती. त्यापुढे जात सातपुते यांनी कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपल्बध करून दिल्या आहेत. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम तणावात रहावे लागते. अशावेळी आर्थिक घडी बसवतानाही त्यांची मोठी कसरत होते. त्यामुळे “सागरिका’चा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे, शिवाय राज्याला आदर्श देणारा आहे. त्यामुळे राज्यभर प्रत्येक जिल्हा पोलीस दलाला हा उपक्रम राबवण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, “सागरिका’मध्ये किराणा साहित्यापासून ते टीव्ही, फ्रीजपर्यंत सगळ्या वस्तू कमी दरात विक्री केल्या जात आहेत. या उपक्रमाला कर्मचाऱ्यांमधूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने दर दिवशी तीस हजारांची विक्री होणाऱ्या या कॅन्टीनमध्ये सध्या दरदिवशी तीन लाखांची विक्री होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी केले तर आभार उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी मानले.
पोलिसांसह आजी माजी सैनिकांनाही सवलत
सागरिका कॅन्टीन हे पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी असले तरी त्याठिकाणी आर्मी, बीसएफ, एसआरपी याठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही खुले करण्यात आल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
ना. देसाईंचा असाही मोठेपणा
काही दिवसांपूर्वी ना. देसाई यांच्या ताफ्यातील एका गाडीचा सायरन न वाजल्याने तसेच काही तांत्रिक चुकांमुळे गाडीच्या चालकाला निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर एसपींनी त्या कर्मचाऱ्याचे निलंबन केले होते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी परिवहन विभागाला मनुष्यबळ नसल्याने वाहने नादुरूस्त राहत आहेत, परिणामी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत असल्याचे ना. देसाई यांच्या लक्षात आणून दिले असता, काही तांत्रिक गोष्टींमुळे निलंबन केल्याचे सांगत, उद्घाटनाच्या कार्यक्रमात माध्यमांसमोरच ना. देसाई यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.