सातारा – जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अन उपाध्यक्षपदासाठी कोणाचे नाव निश्चित करायचे, यासाठी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनलची बैठक जिल्हा बँकेत सुरु होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीत प्रत्येक संचालकांची फक्त मते जाणून घेतल.
त्यामुळे ना. रामराजे नाईक-निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेही यावर एकमत झाले नसल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर कोण विराजमान होईल, याबाबतचा निर्णय शरद पवार सोमवारी सकाळी घेणार असून त्यानंतरच निवडीचा कार्यक्रम होईल.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवार, दि. ६ रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकार प्राधिकरणाने नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केला आहे.
त्यानुसार सकाळी ११.३0 ते ११.४0 या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. ११.४0 ते ११.४५ या वेळेत अर्जछाननी होणार आहे. जर अनेकांचे अर्ज दाखल झाले तर बारा वाजता मतदानप्रक्रिया होणार आहे.
दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने अध्यक्षपदावरुन जिल्ह्याचे राजकारण घडणार की बिघडणार याकडेच उत्सुकता लागून राहिली आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे अकरा संचालक आहेत बाकीचे दहा सदस्य भाजप, सेना आणि बंडखोर असे विभागले गेले आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रविवारी रात्री दोन बैठका झाल्या. पहिली बैठक सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या अनुषंगाने चर्चा होईल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात येेथे त्या विषयावर काही चर्चा झालीच नाहीत.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन करायचे यावर चर्चा झाली.
ही बैठक संपल्यानंतर दुसरी बैठक जिल्हा बँकेतच घेणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनलमधील विजयी संचालक उपस्थित राहणार होते. मात्र, काही संचालक अनुपस्थित असल्यामुळे रात्री रामराजे निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील शासकीय विश्रामगृहावरच थांबले. दरम्यान, रामराजे आणि बाळासाहेब दोघेही जिल्हा बँकेत आले आणि येथे बैठक सुरु झाली.
या बैठकीस रामराजे, बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे, प्रदीप विधाते, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर, रामभाऊ लेंभे, ऋतूजा पाटील, लहूराज जाधव, शिवरूपराजे खर्डेकर, अनिल देसाई, कांचन साळुंखे, सुरेश सावंत उपस्थित होते.