संदीप राक्षे
सातारा – सातारा शहर व परिसरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे पेन्शनरांचा सातारा अस्वस्थ झाला आहे. शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेले दोन कोयता हल्ले, बकासुर गॅंगची दहशत, लल्लन जाधवचा फळ विक्रेत्यावर झालेला हल्ला तसेच गांजा विक्रीसह पिस्तूल तस्करीची वाढती प्रकरणे यामुळे सामान्य सातारकर अस्वस्थ आहे. या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यापुढे आहे.
सातारा शहराची कायदा सुव्यवस्था या वाढत्या गुन्हेगारीमुळे अडचणीत आली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील गुन्हेवृत्तांचा आढावा घेतला तर सातारा शहर पोलिसांचे डिटेक्शन एकीकडे होत असताना गुन्हेगारी कारवाया त्यापेक्षा दुप्पट गतीने वाढल्याचे दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी महामार्गाजवळील चौकात एका कापड दुकानात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुकानात घुसून बंदुकीच्या धाकाने रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकारात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र, या घटनेची दहशत पसरल्याने या परिसरातील छोटे व्यावसायिक प्रचंड तणावग्रस्त आहेत.
माहुली येथे युवा नेते संतोषभाऊ जाधव यांच्यावर दोघांनी माफी मागण्याचे निमित्त करून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यातील मुख्य संशयित हर्षद साळुंखे याला पोलिसांनी अटक केली आहे. टपरी हलवण्याचे सांगितल्याच्या रागातून हर्षदने संतोष जाधव यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला तो नियोजित होता असे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार हर्षद साळुंखे हा भाऊंच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांपैकी एक होता. माहुली त्याचे आजोळ असताना तेथे त्याने थेट संतोष जाधव यांच्यावर हल्ला करावा म्हणजे यामागे मास्टरमाइंड वेगळाच असल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे.
या घटनेमुळे माहुली परिसरात तणाव आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे नवे कारभारी हेमंतकुमार शहा यांना हे प्रकरण अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळावे लागणार आहे. यातील आणखी एक माहिती म्हणजे संबंधित संशयितावर अल्पवयीन असताना खुनाच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. या टपरी हटवण्याच्या पाठीमागे टपरीवर सापडणारा गांजा आणखी एक कारण आहे.
संबंधित संशयित प्रतापसिंह नगरातील काही जणांशी संपर्कात होता. हे टोळके गावात बसून सर्रास गांजा ओढण्याचे उद्योग करत होत,े अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच हा तणाव वाढून संतोष भाऊ जाधव यांच्यावर कोयता हल्ला होण्यापर्यंत पुढे गेले होते. आप्पा मांढरे यांच्यावर सुद्धा गोल बागेसमोर ऋषभ जाधव यांनी दोन अल्पवयीन मुलांसह गोळीबार केला होता. याप्रकरणी तीन पिस्तुले जप्त करण्यात आली. लिंब येथे जितेंद्र सावंत यांच्यावर सुद्धा अल्पवयीन मुलांकडून हल्ला झाला होता.
गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अल्पवयीन मुले घटनेनंतर रिमांड होममध्ये पाठवली जातात. पण जेव्हा ती तेथून बाहेर पडतात त्यावेळी त्यांच्यावर कोणाचेही प्रत्यक्ष नियंत्रण राहत नाही. बाल सुधार सुरक्षा समितीचे काम जरी सुरू असले तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना मॉनिटर करणे गरजेचे असताना ते काम अपुऱ्या मनुष्यबळावी प्रभावीपणे होताना दिसत नाही.