सातारा (प्रतिनिधी) – माजी सहकार, विधी व न्याय मंत्री, ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने सहकारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काकांनी विचारांशी कधीही गद्दारी केली नाही. काकांचे विचार पुढे नेणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी काकांना श्रद्धांजली वाहिली.
विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी शोकसभा झाली. ना. रामराजे नाईक निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील,आ. महेश शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा बॅंकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, नरेंद्र पाटील, ऍड. सदाशिव सानप, दादासाहेब गोडसे, राजू शेळके, मनसे जिल्हाध्यक्ष विकास पवार, लालासाहेब पवार उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासातील काकांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. मला पुढे आणण्यात काकांचा मोठा वाटा आहे. जिल्हा बॅंकेवर काकांचे प्रेम होते. त्यांनी घातलेले नियम व परंपरा यापुढेही सुरू राहणार आहे. बॅंकेबाबत काकांचे विचार धोरणात्मक होते. काका निर्भीड होते. पुढच्या पिढीने काकांचे विचार, परंपरा जपावी. जिल्हा बॅंक पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ना. पाटील म्हणाले, सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानून काकांनी राजकारण केले. ग्रामीण भागातील लोकांना न्याय दिला. संघटन केले.
काकांनी पुरोगामी विचार कधीच सोडला नाही. खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, काकांनी अनेकांना घडविले. ते सामान्य कार्यकर्त्याला संधी देत. शेतकऱ्यांचा संबंध असणारे प्रत्येक क्षेत्र त्यांनी मोठे केले. काका व बाबा यांनी एकत्र येण्याचा केलेला विचार चांगला होता. ऍड. उदयसिंह पाटील यांना संधी देऊया. ईर्षा बाजूला ठेवून एकत्र येऊ.
उदयसिंह यांचे नेतृत्व पुढे आणण्याची जबाबदारी रामराजे, बाळासाहेब, बाबा आपण घेऊया. ना. देसाई म्हणाले, जिल्ह्याच्या जडणघडणीत काकांचा मोठा वाटा होता. काकांची शिस्त, भाषणे विधिमंडळात अनुभवली. जिल्ह्याच्या बाबत त्यांचे व्हिजन होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एका पर्वाचा अस्त झाला आहे. काकांनी 35 वर्षे अविरत कराड दक्षिणचे नेतृत्व केले. अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना छाप पडली. जिल्हा बॅंक अग्रणी ठेवण्यात काकांचे योगदान होते. उंडाळे हे 1973 पासून चळवळीचे केंद्र बनले. आमची काही दिवस अत्यंत जवळीक तर काही दिवस फारकत होती. पुरोगामी विचारांना धोका असल्याने आम्ही एकत्र येण्याचा विचार केला.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राजकीय समीकरणे बदलण्याची ताकत काकांमध्ये होती. काकांनी शेवटपर्यंत आपला विचार सोडला नाही. आ. महेश शिंदे म्हणाले, खूप कमी वयात मला काकांचा सहवास लाभला होता. प्रा. बानुगडे म्हणाले, काकांचा एक पाय जनसमुदायात तर एक पाय प्रगतीच्या दिशेने झेपावत होता.
डॉ. येळगावकर म्हणाले, काकांच्या जाण्याने जिल्ह्यावर आघात झाला आहे. डॉ. सरकाळे म्हणाले, काकांनी शेवटच्या क्षणापर्यंत बॅंकेसाठी योगदान दिले. बुधाजीराव मुळीक, सुनील माने व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काकांच्या आठवणींना उजाळा दिला.