अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या सहकार्याने मानवी चाचण्या सुरू
सातारा (प्रतिनिधी) – करोनाला प्रतिबंध करण्यासाठी आता कडुनिंबाचा आधार घेतला जाणार आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या मदतीने फरिदाबादमधील ईएसआयसी रुग्णालयात 250 करोना योद्ध्यांवर अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक चाचण्या पहिल्यांदाच होणार आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष ऑक्टोबरपर्यंत हाती येणार आहेत.
साताऱ्यातील “निसर्ग बायोटेक’ या कंपनीने चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या माध्यमातून दि. 7 ऑगस्टपासून चाचण्यांना सुरुवात झाली आहे. कोविड 19वर चाचणी करणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. फरिदाबाद येथील ईएसआयसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये “प्लासिबो’ ही नियंत्रित चाचणी सुरू आहे.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका डॉ. तनुजा नेसरी या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फरिदाबाद मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. असीम सेन व रुग्णालयातील सहा डॉक्टरांची टीम या चाचण्या करत आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या पुढाकारामुळे करोनावरील औषध ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्यांच्या हाती पडल्यास अनेकांना त्यांचा मोठा लाभ होणार आहे.
डबल ब्लाइंड पद्धत…
चाचण्यांसाठी निवडलेल्या 250 पैकी 125 जणांना 28 दिवसांसाठी “नीम’ कॅप्सूल तर सव्वाशे लोकांना “प्लासिबो’ म्हणजे मोकळ्या कॅप्सूल दिल्या जाणार आहेत. डबल ब्लाइंड पद्धतीत डॉक्टर अथवा रुग्ण यापैकी कोणालाही कोणत्या कॅप्सूलमध्ये औषध आहे की नाही, हे समजत नाही. त्याचे परिणाम 28 दिवसांनी तपासले जाणार आहेत.
कडुनिंबाचीच निवड का?
कडुनिंब ही ज्ञात अँटीव्हायरल वनस्पती आहे.
ती ताप, हार्पिस रोगासह विविध आजारांवरील उपचारांसाठी वापरली जाते.
कडुनिंबाचा पाला रक्त शुद्धीकरणासाठी वापरला जातो.