कोरेगाव – “माझी कसलीही चौकशी लावा, ईडी, इन्कम टॅक्सला मी घाबरत नाही. कोणाला काही करायचे असेल तर करा, आमच्यात दम आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. आपण परिणामांचा विचार करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कठापूर येथे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. शिंदे बोलत होते.
महायुतीच्या काळात सर्वाधिक विकास निधी आणून मी कामे केली आहेत. माझ्यावर भाजपवाले करत प्रेम होते, त्यावेळी शंभर कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असते, असा चिमटा त्यांनी काढला. पक्षाशी आणि अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे, त्यांचे आम्ही पाईक आहोत, याची त्यांना कल्पना आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, “” किरीट सोमय्या येथे आला होता. मी अजितदादांना म्हटले आम्हाला परवानगी द्या, एकदाच त्याचा तोतरेपणा बाहेर काढतो. आपण रोज बघतोय, सकाळी ईडी लावायची, चौकशी सुरु होती, ईडी आणि इन्कम टॅक्स आहे, नार्कोटिक्स आहे. काय राजकारण चाललय, याला लोकशाही म्हणतात का, असा सवाल त्यांनी केला. करोना काळात केलेल्या कामाचा कधीही श्रेयवाद घेण्याचा मी प्रयत्न केला नाही, जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हाच त्याच्यावर टीका होत असते. आम्ही आमच्या पध्दतीने कामे केली, असे सांगून शिंदे म्हणाले, “”शासकीय रुग्णालय मी मंजूर केले.
या मतदारसंघात जेवढी जेवढी विकास कामे केली, ती मीच केली, मात्र त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आम्ही केला नाही. कोविड योद्धा आमदार निलेश लंके यांच्या कामाची पध्दत पाहून काही जणांनी करोना रुग्णांना मिठ्या मारण्याचा प्रयत्न केला. म्हणे काय तर कोविड सेंटर काढले. बिल किती तर 70 ते 80 हजार रुपये. मेडिकल दुकान यांचेच, रेमडेसिविर इंजेक्शन सरकारचे. मात्र, मिळते कोठे तर यांच्याच मेडिकल दुकानात.
पेशंट सिरीयस झाल्यास आहे की पंढरपूरचे हॉस्पिटल. हे आम्हाला काही माहीत नाही का, मात्र आजवर आम्ही बोललो नाही, आता सर्व काही बोलणार.” सरकारकडून करोनाच्या नावाखाली कोण पैसे मागतेय, हे लवकरच जगजाहीर करणार आहे, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.
आ. निलेश लंके म्हणाले, “”माथाडी चळवळीतून आलेल्या शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक काम केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि विकासकामे करणारा एकमेव संघर्षशील, ऊर्जावान व लढवय्या आमदार म्हणून ते ओळखले जातात. त्यांना पुन्हा एकदा कोरेगावचे आमदार बनवूया. शरद पवार व अजित पवार यांचा एकनिष्ठ मावळा म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात. ते खऱ्या अर्थाने वाघ आहेत.
वाघ कधीही म्हातारा होत नाही, तो झेप कशी मारतो, हे सर्वजण जाणून आहेत.”लढवय्या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मुंबईत आधार देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी करोना काळात अत्यंत चांगले काम करत हजारो लोकांना जीवदान दिले आहे.
करोना काळात अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या धन्वंतरींचा त्यांनी गौरव केला, ही आनंदाची बाब आहे. गोरगरिबांबाबत तळमळ असलेले हे जनतेचे नेतृत्व आहे, त्यांनी आपल्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यांनी विकासाची गंगोत्रीच मतदारसंघात आणली आहे, असेही लंके यांनी सांगितले.