नवी मुंबई येथील घनकचरा प्रकल्पास कराड नगरपालिकेच्या पथकाची भेट
कराड (प्रतिनिधी) – मुंबई महापालिकेत बांधकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून नवीन साहित्य तयार करण्यासाठीचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्याच पद्धतीने कराड पालिकेत प्रकल्प राबविण्याच्या उद्देशाने पालिका टीमने नुकतीच पाहणी केली. तसेच प्रकल्पाची माहिती घेतली.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. महापालिकेने तुर्भे येथे केलेल्या घनकचरा प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली कराडची टीम गेली होती. यावेळी कराड पालिकेचे नोडल ऑफिसर आर. डी. भालदार, जलअभियंता अशोक पवार, प्रशांत कांबळे, मुकादम मारूती काटरे, अभय पांढरपट्टे, सय्यद बारगीर यावेळी उपस्थित होते.
कराड पालिकेने गत दोन वर्षात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवला आहे. सुमारे 15 कोटी रूपयांचे बक्षीस पटकावले आहे. सन 2021 च्या स्पर्धेत प्रथम येऊन हॅट्रीक करण्याचा पालिकेचा मनोदय आहे. त्याअनुषंगाने कराड पालिकेने तयारी सुरू केली आहे. कराड पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. त्यातही आणखी नाविण्य आणण्याच्या हेतूने नवे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने बांधकाम साहित्यावर प्रक्रिया करून नवे साहित्य तयार करण्याचा प्रकल्प राबविला आहे. असा प्रकल्प कराड पालिकेत राबविण्याच्या हेतूने ही भेट देण्यात आली. त्यामुळे कराडलाही असा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.