वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचे नुकसान
कराड (प्रतिनिधी) – रविवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह पावसाने कराड व पाटण तालुक्यातील ऊसपिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काहींच्या घरावरील पत्रेही उडून गेले. यात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रशासनाच्या वतीने सोमवारी सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते.
रविवारी रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांच्या घरांवरचे पत्रे उडाले. काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले. तर काहींच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने कराड शहरात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर सोमवारी सकाळी शहरातील पाणी पुरवठा करण्यात आला नव्हता.
गेल्या काही महिन्यांपासून करोना महामारीमुळे सर्वजण हैराण झाले आहे. त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यात करोनाच्या भितीने अनेकजण बाहेर पडणे टाळत आहेत. मात्र, शेतकऱ्याला शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही. गेल्या चार महिन्यापांसून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी शेतात राबत आहेत. यावर्षी पावसानेही साथ दिल्याने पिके जोमाने वाढली आहेत. गतवर्षी पुरामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गमवावी लागली होती. यावर्षी उत्पन्नात चांगली वाढ होईल. अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र, रविवारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
कराड तालुक्यात उत्तर व दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी ऊसाची जोमाने वाढ झाल्याने उत्पन्नात आणखी वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ऊसपिके भुईसपाट झाली आहेत. तसेच अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. अनेक गावांत वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सोमवारी सायंकाळी पूर्ववत झाला. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांना रात्र बसून काढावी लागली. वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
नुकसानीचे पंचनामे करा…
रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. करोना महामारीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्यात या वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. त्यातून सावरण्यासाठी नुकसानीचे तात्काळ पंचनामे कराण अशा सूचना ना. बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.