सातारा – सातारा शहराच्या बहुसंख्य भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने शनिवारी सातारकरांची गर्दी रस्त्यावर पाहायला मिळाली. भरदुपारच्या वैशाख वणव्यात राजपथासह बहुतेक रस्ते वाहनांनी व तर दुकाने नागरिकांनी तुडुंब होती.
करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू असून गर्दी टाळणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू आहे. एखादी गोष्ट सुरु झाली की नागरिक गर्दी करतात. अशा गर्दीमुळे संसर्ग वाढून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही गर्दी टाळण्यासाठीच पुढील काळात काही नियम, बंधने पाळणे गरजेचे आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गेल्या 48 तासांत सातारकरांनी रस्त्यावर गर्दी केली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडले तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे व गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व नागरिकांची सुरक्षा खूप महत्वाची असून त्यासाठीच सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनाला मदत करण्याची गरज आहे. मात्र, शनिवारी प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसले नाही. साताऱ्यात दुचाकीचा डबल सीट प्रवास सर्रास सुरू होता. चारचाकीसुध्दा प्रवाशांची प्रतिबंधित संख्या ओलांडून धावत होत्या. खण आळी व तांदूळ आळी, राजवाडा, समर्थ मंदिर, पंताचा गोट अशा परिसरात किराणा मालाच्या दुकानासमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सोमवार पेठेतील बेकरीचे शटर उघडल्याने टोस्ट, खारी, पावाच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडाल्याचे चित्र पाहयला मिळाले. रस्ते बॅरिकेटिंगने अडवले होते तिथे वाहतूक कोंडीची समस्या उदभवली. पोलिसांनी शनिवारी फार नियमांची आडकाठी केली नाही.
जिल्हयात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. आता आवश्यकतेनुसार प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाद्वारे काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. पण या सर्व गोष्टी हळूहळू सुरु होतील. या प्रक्रियेतील सर्व नियम सर्वांना पाळणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकरी शेखर सिंह यांनी सांगितले होते. शुक्रवारी शहरातील किराणा माल, मेडिकल, दूध, भाजीपाला विक्री सुरु झाली.
त्यामुळे सातारकर नागरिकांची रस्त्यावर, दुकानांसमोर वर्दळ सुरु झाली. बऱ्याच अंशी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्व कळाले असले तरी सर्वांनाच गरजेच्या वस्तू हव्या असल्याने गर्दी होत आहे. यापुढे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, स्वच्छता आदी गोष्टी अंगवळणी पाडून घेण्याची गरज आहे. सकाळी दुकाने सुरु झाल्याने दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत रस्त्यांवर वर्दळ सुरु राहिली. काही भागात नेमका आदेश न कळल्याने दुकानेही सुरु नव्हती. कळल्यानंतर दुकानेही सुरु झाली.
मात्र, दुपारी 12 नंतर उन्हाचा तडाखा वाढत गेला. 41.3 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामुळे हैराण झालेले सातारकर मग आपापल्या घरट्यात परतू लागले. दुपारनंतर साताऱ्यातील रस्ते पुन्हा ओस पडले होते. सातारा शहरात सदरबझार, राधिका रस्त्यावर गार्डन सिटी, प्रतापगंज पेठ, जिल्हा कारागृह, कोडोली येथे रुग्ण आढळून आले असल्याने ती ठिकाणी मायक्रो कंटेटमेंट झोन आहेत. तो भाग सील करण्यात आला असून या सर्व ठिकाणी नागरिकांना हालचाली करण्यास निर्बंध आहेत. जोपर्यंत कंटेटमेंट झोन उठत नाही तोपर्यंत परिसर सोडता येणार नाही. त्यामुळे या परिसरात शांतता आहे.