सातारा ( प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे . शिरवळ आणि लोणंद या दोन शहरांमध्ये सकाळी सहा ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ संचारबंदी लागू करण्यात आली असून खंडाळा उपविभागाच्या प्रांत मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत .
प्रांतांनी प्रसृत केलेल्या आदेशानुसार खंडाळा तालुक्यात हॉटेल व खाद्यगृहे व दुकानांमध्ये एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के नागरिकांना प्रवेश देणे निर्धारीत करण्यात आले आहे . करोना संक्रमण रोखण्यासाठी दळणवळणावर मर्यादा आणण्यात आली असून सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे .
दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे आदेशानुसार बंधनकारक आहे .एण्ट्री व एक्झिट पाँईटला थर्मल गन आणि सॅनिटायझरचा आणि सुरक्षितता म्हणून मास्कचा वापर सक्तीचा आहे . या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे .
या आदेशाचे निर्गमन प्रांत आव्हळे यांनी बुधवारी सायंकाळी केले असून संचारबंदीचे कठोर पालन सुरु झाले आहे . ही संचारबंदी तालुक्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू राहणार आहे .