धनंजय माने
कुुकुडवाड : विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात, घराशेजारील परिसरात केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर म्हणजे शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांच्या कष्टाचे हे फलित आहे. पंचायत समिती सभापती कविता जगदाळे व गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी या उपक्रमाची पाहणी करून कौतुक केले.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी संजय खरात यांनी वडगावमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांनी गृहभेटी दिल्या.
तेवढ्यावरच न थांबता प्रत्येक घरात शालेय वातावरण तयार केले. त्यामुळे संपूर्ण गावात घरोघरी शाळा, असे चित्र निर्माण झाले आहे. या उपक्रमास कविता जगदाळे, सोनाली विभुते व केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी भेट दिली. त्यांनी घरोघरी झालेल्या शाळा पाहून विद्यार्थी व पालकांशी हितगुज केले.
“घरोघरी शाळा’ हा उपक्रम राज्यातील पहिलाच असल्याचे मत जगदाळे यांनी व्यक्त केले. करोना संकटाच्या काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी संजय खरात यांनी घरोघरी शाळा निर्माण केल्या. त्यांचे कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत विभुते यांनी व्यक्त केले.
आवळे म्हणाले, करोना काळात तीन हजारांपेक्षा जास्त घरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणारे खरात हे राज्यातील एकमेव शिक्षक असतील. या भेटीदरम्यान इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबरोबर गोष्टींची पुस्तकेही वाचून दाखवली.
संख्या वाचन, बेरीज-वजाबाकी, पाढे म्हणून दाखवले. काही मुलांनी आपली ओळख इंग्रजीमधून करून दिली. शैक्षणिक साहित्याचा कृतियुक्त वापर करून दाखवला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय ओंबासे यांनी स्वागत करून आभार मानले.