शेतकरी धास्तावले; जोमदार खरीप बाजरी, मका, कडधान्यांसह भाजीपाला आणि ऊसाचे नुकसान
फलटण (प्रतिनिधी) – शहर व तालुक्यात एका रात्रीत सरासरी 46 मिलिमीटर पाऊस झाला. जोमदार आलेल्या खरीप बाजरी, मका, कडधान्ये यांसह भाजीपाला आणि अगदी उभ्या ऊस पिकाचेही वादळी वारे व पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
फलटण तसा रब्बीचा तालुका. अलीकडे मात्र बदलता निसर्ग, हवामान, कमी जास्त पाऊसमान यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात पिके घेतली जात आहेत. यावर्षी पाऊसपाणी चांगले झाल्याने खरीप बाजरी, मका यासह भाजीपाला, कडधान्ये, ऊसाचे क्षेत्रही जोमदार आले आहे. काल (रविवारी) रात्री झालेले वादळी वारे आणि पावसात ऊसासह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती उत्पादनांचे दर पडले आहेत. मात्र, खते, बी- बियाणे, कीटकनाशक औषधे, मजुरी या शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला असताना खरीपातील जोमदार पिके पाहिल्यानंतर तो काहीसा सुखावला असतानाच वादळ वारे व पावसाने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा धास्तावला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांत महसूल मंडलनिहाय फलटण तालुक्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
कंसात एकूण पाऊस. फलटण 55 (348), आसू 52 (367), होळ 61 (290), गिरवी 36 (265), आदर्की 14 (160), वाठार निंबाळकर 54 (374), बरड 57 (287), राजाळे 35 (202), तरडगाव 52 (678). पावसाची हा आकडेवारी महसूल मंडलनिहाय आहे. मात्र, पाटबंधारे खात्याकडील पावसाची आकडेवारी नीरा उजवा कालवा क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याचे दाखविणारी आहे. शासनाच्या निकषानुसार 61 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास शासन पिकाची नुकसानभरपाई देण्यास बांधिल असते. तथापि, फलटण तालुक्यात काही ठिकाणी 61 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा थोडा कमी पाऊस झाला असला तरी जोमदार उभी पिके भुईसपाट झाल्याने तोंडचा घास हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शासनाने या नुकसानीची संपूर्ण भरपाई देऊन शेतकरी सावरला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत
आहे.