सातारा (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्यातील सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा मोठा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाच्या प्रगतीला खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेऊन योग्य कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली. राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन हे प्रकरणी घटनापीठाकडे वर्ग केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर महाराष्ट्रात मतमतांतरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नव्हते. त्यामुळे आज मराठा समाजाला परिणाम भोगावा लागत आहे. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे. मराठा समाज एकटा नाही, एवढेच सांगतो. मी त्यांच्यासोबत आहे. या आधी मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तिथे आरक्षण टिकवता आले; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.
केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यासाठी विशेष बाब सिद्ध करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण हाताळताना राज्य सरकारने खबरदारी घेतली नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला अंतरिम आदेश हा जणू अंतिम निकाल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना, न्यायालयासमोर काय कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत, याची पूर्ण चर्चा झाली नसताना, इतका मोठा निर्णय होणे, हा मराठा समाजावर अन्याय आहे. आता अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवणे, हाच मार्ग शासनासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती व नोकरभरतीत आरक्षण कायम ठेवण्यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.