प्रशांत जाधव
सातारा – खटाव-माण या तालुक्यांमधील जनता नेहमीच्या दुष्काळाने पिचल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या लोकांच्या भावना तीव्र असणे स्वाभाविक असले, तरी त्यांच्याकडे सहनशीलतादेखील आहे, असा अनुभव अनेकदा प्रशासनातील लोकांना आला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये खमके अधिकारी न मिळाल्याने या कष्टकरी जनतेला गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांचा सामना करावा लागत होता. पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख हजर झाल्यानंतर येथील चित्र बदलेल, अशी अपेक्षा असतानाच, काही जुन्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले. त्यामुळे इच्छा असूनही डॉक्टरांना त्यांच्या मनात असलेले “पोलिसिंग’ दाखवता आले नाही. परिणामी सध्या येथील पोलिसिंग म्हणजे “रोग रेड्याला अन् उपचार पखाल्याला’, असे आहे.
दहिवडी पोलीस उपविभाग हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून, या उपविभागाच्या हद्दीतील खटाव व माण या तालुक्यांमधील छोट्या मोठ्या गोष्टींवर राजकारणाचा प्रभाव दिसतो. डॉ. देशमुखांनी दोन्ही तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत; परंतु काही भानगडबाज कर्मचाऱ्यांना हाताळण्यात त्यांना अपयश आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
वरिष्ठ अधिकारी कितीही प्रामाणिक असला, तरी ठरावीक कर्मचारी त्यांच्या नावावर किरकोळ गोष्टींचाही “बाजार’ करत आहेत. त्यामुळे देशमुख यांची प्रतिष्ठा मलीन होत आहे. साहेब कडक आहेत, साहेब चिडलेत, साहेबांनी बोलवले आहे, असली कारणे सांगून संबंधित कर्मचारी सर्वसामान्यांच्या खिशात हात घालत असल्याची चर्चा आहे. ही गोष्ट समाजाला कळते, मग डॉ. देशमुख यांना हे कळत नसेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या “बापू’ विषयी अनेक तक्रारी असूनदेखील डीवायएसपी त्याला पाठीशी घालत असल्याचे काही लोक खासगीत सांगतात.
संबंधित कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी जवळपास 13 वर्षे झाली असून त्याच्याविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रारी होऊनही, त्याला पाठीशी घालण्यात डीवायएसपींची कोणती मजबुरी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दारू, गांजा विकणारे, ढाबेवाले, भंगारवाले, पवनचक्कीवाले, रस्त्यांचे ठेकेदार, मटका घेणारे, गुटखा विकणारे, अधूनमधून खेपा टाकणारे वाळूवाले या सगळ्यांचा “सीएसआर’ कोणाच्या खिशात जातो, हे तपासून सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेले “पोलिसिंग’ होण्यासाठी डीवायएसपींनी प्रयत्न करायला हवेत, अन्यथा फक्त माणूस बदलला, पण कामाची पद्धत तीच राहिली तर पोलीस जनतेचा उरलासुरला विश्वासही गमावतील, अशी भीती आहे